ग्लासगो: येथे सुरु असणाऱ्या जागतीक बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅडमिंटनपटूनी चांगली कामगिरी करत दुसरी फेरी गाठली. काल ८ पैकी ७ खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
त्यात किदांबी श्रीकांत (पुरुष एकेरी), प्राजक्ता सावंत आणि योगेंद्र किष्णान(मिश्र दुहेरी), के मनीषा आणि स्वस्तिक साईराज(मिश्र दुहेरी), समीर वर्मा(पुरुष एकेरी), तन्वी लाड( महिला एकेरी), प्राजक्ता सावंत आणि आरती सारा सुनील (महिला दुहेरी) यांचा समावेश आहे.
आज पीव्ही सिंधू (महिला एकेरी), अश्विनी पोनप्पा(मिश्र दुहेरी), अजय जयराम(पुरुष एकेरी), साई प्रणित (पुरुष एकेरी) यांच्यासह एकूण भारतीय खेळाडूंचे एकूण १० सामने होणार आहेत.
अश्विनी पोनप्पाचे महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा दोन प्रकारात सामने होणार आहेत. परंतु भारतीयांचं सर्व लक्ष असेल ते चतुर्थ मानांकित पीव्ही सिंधू, १३व्या मानांकित अजय जयराम आणि १५व्या मानांकित साई प्रणितवर.
रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सिंधूने २०१३ आणि २०१४मध्ये येथे कांस्यपदक जिंकले आहे. एप्रिल महिन्यात इंडिया ओपन सिरीज जिंकणाऱ्या सिंधूला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विशेष चमक दाखवता आली नव्हती.
दुसऱ्या बाजूला अजय जयराम ज्याने वर्षाच्या सुरुवातील चांगली करता यावी म्हणून बेंगलोरमधून आपला मुक्काम मुंबईला हलवला तो लुका व्रबेरबरोबर पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. २९ वर्षीय अजय जयराम हा दिग्गज प्रशिक्षक टॉम जॉन यांचं मार्गदर्शनखाली प्रशिक्षण घेत होता. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ ही क्रमवारी प्राप्त केली आहे. त्याला स्पर्धेतही १३व मानांकन आहे.