रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. मात्र, या सामन्यात भारतीय संघ 6 विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे संघासोबतच चाहत्यांच्या आशांवरही पाणी फेरले गेले. या पराभवानंतर भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी पराभवासाठी विराट कोहली आणि केएल राहुल यांना जबाबदार ठरवले आहे. त्यांनी म्हटले की, विराट-राहुलच्या एका चुकीमुळे भारत अंतिम सामन्यात पराभूत झाला.
विराट आणि राहुलची चूक काय?
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय फलंदाजीविषयी बोलताना म्हटले की, “भारताला फलंदाजी करताना आणखी मोठी धावसंख्या करण्याची गरज होती. जेव्हा विराट आणि राहुल फलंदाजी करत होते, तेव्हा यादरम्यान खेळाडूंकडे वेगाने खेळण्याची चांगली संधी होती.”
त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, “जेव्हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श गोलंदाजीसाठी आले होते, तेव्हा यादरम्यान विराट कोहली आणि केएळ राहुल यांच्याकडे गोलंदाजांवर निशाणा साधण्याची शानदार संधी होती, पण दोघेही ऑस्ट्रेलियाच्या पार्ट टाईम गोलंदाजांविरुद्धही सांभाळून खेळले.”
आक्रमकता दाखवण्यात भारतीय खेळाडू अपयशी
रोहित शर्मा (Rohit Sharma) 47 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचे इतर फलंदाज आक्रमकता दाखवताना दिसले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ चांगली धावसंख्या उभारू शकला नाही. खरं तर, ट्रेविस हेडने 2 षटके टाकली होती. त्यात त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याव्यतिरिक्त मिचेल मार्शनेही 2 षटके टाकत फक्त 5 धावा खर्च केल्या. माजी दिग्गजांच्या मते, “सेट फलंदाज असूनही विराट आणि राहुलने पार्ट टाईम गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या नाहीत.” त्यामुळेच दिग्गजांनी या पराभवासाठी विराट आणि राहुलला जबाबदार धरले.
विशेष म्हणजे, दोघांनीही सामन्यात अर्धशतक केले होते. विराट कोहली (Virat Kohli) याने 63 चेंडूत 54 धावा, तर केएल राहुल (KL Rahul) याने 107 चेंडूत 66 धावांचे योगदान दिले होते. (world cup 2023 ind vs aus final sunil gavaskar and sehwag blamed kohli and rahul for defeat )
हेही वाचा-
‘रोहित जगातील सर्वात दुर्दैवी माणूस…’, भारताकडून वर्ल्डकप हिसकावताच शतकवीर हेडचे ‘हिटमॅन’विषयी मोठे भाष्य
गावसकरांनी सांगितला IND vs AUS Finalचा टर्निंग पॉईंट; रोहितचं नाव घेत म्हणाले, ‘….गरजच नव्हती’