आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणूमुळे मागील वर्षी ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र यावर्षी पुन्हा एकदा भारतात ही स्पर्धा परतली आहे.
यंदाच्या हंगामात संघांची संख्या वाढवणार असल्याची शक्यता यापूर्वी वर्तविण्यात येत होती. मात्र बीसीसीआयने आगामी हंगामात केवळ आठच संघ कायम राहतील असे स्पष्ट केले. परंतु आता पुढील हंगामात म्हणजे आयपीएल २०२२ मध्ये संघांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२ नव्या संघांचा होणार समावेश
आयपीएलच्या आगामी हंगामात दोन नवीन संघांचा समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ आठ नाही तर दहा संघ विजेतेपदासाठी झुंजताना दिसतील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने याबाबत माहिती देतांना म्हंटले, “आयपीएल २०२२ मध्ये दहा संघ खेळतील. यावर्षी मे महिन्यापर्यंत हे संघ निश्चित केले जातील. जेणेकरून ते आपली पुढील प्रक्रिया सुरू करू शकतील. कारण ती प्रक्रिया पूर्ण करायला देखील वेळ लागू शकतो.”
गांगुलीने यापूर्वीच दिले होते संकेत
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने यापूर्वीच या गोष्टीचे संकेत दिले होते. आयपीएलच्या आगामी हंगामात दोन नवीन संघ समाविष्ट केले जाऊ शकतात, हे त्यांनी सांगितले होते. याबाबत विचार करण्यासाठी १३ मार्च रोजी बीसीसीआयची एक बैठक देखील बोलावण्यात आली होती.
२ वर्षांनंतर भारतात आयपीएल
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाद्वारे या स्पर्धेचे दोन वर्षांनंतर भारतात पुनरागमन होत आहे. मागील वर्षी युएईतील हंगामानंतर भारतात ही स्पर्धा कधी परत येईल, याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र यावर्षी भारतात ही स्पर्धा खेळवली जात असली तरी देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता यंदा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाहिये.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! विजय हजारे ट्रॉफी फायनलमध्ये पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, उचलून नेलं मैदानाबाहेर
अर्धशतक हुकलं तरीही मिताली राज ठरली विक्रमवीर, वनडेतील मानाच्या रेकॉर्डमध्ये अव्वल
Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग