---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुजाराला मिळणार नारळ? ‘या’ तीन फलंदाजांचे आहेत पर्याय

On: मंगळवार, जून 29, 2021 8:09 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच साऊथम्पटनच्या मैदानावर पार पडला. १८ ते २३ जून दरम्यान खेळवल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताला पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला हा मोठा धक्का होता. या पराभवाने संघातील उणीवा अधोरेखित झाल्याने आता टीकेचा वर्षाव सुरु झाला आहे. तसेच भारतीय संघाला येत्या ऑगस्ट महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. या मालिकेपूर्वी संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

काही खेळाडूंना कठोर निर्णय घेत संघातून बाहेरचा रस्ता देखील दाखवला जाऊ शकतो. यात सगळ्यात मोठी टांगती तलवार असेल ती चेतेश्वर पुजारावर. पुजारा गेल्या काही महिन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतो आहे. संपूर्ण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तो एकही शतक झळकावू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्याची मागणी केली जाते आहे. या लेखात आपण अशाच तीन खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे भारतीय संघात पुजाराची जागा घेऊ शकतात.

१) केएल राहुल- केएल राहुल भारताच्या तंत्रशुद्ध फलंदाजांपैकी एक आहे. कसोटी सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करतांना हाच गुण सर्वाधिक उपयोगी ठरतो. त्यामुळे पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तो सगळ्यात प्रबळ दावेदार आहे. राहुल एरवी सलामीवीर म्हणून आत्तापर्यंत भारतीय संघासाठी खेळला आहे. मात्र तो तिसऱ्या क्रमांकासाठी देखील सक्षम पर्याय आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना २०१९ साली खेळला होता. मात्र आता त्याला इंग्लंडविरुद्ध संधी मिळू शकते.

२) मयंक अगरवाल- कर्नाटकचा युवा फलंदाज मयंक अगरवालने पदार्पणापासून प्रभावित केले आहे. आत्तापर्यंत त्याने भारतीय संघाकडून १४ कसोटी सामने खेळतांना २ द्विशतक झळकावण्याचा कारनामा केला आहे. मात्र केवळ मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. मात्र आता पुजाराच्या अपयशामुळे भारतीय संघ मयंकला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्याचा प्रयोग करू शकतो.

३) हनुमा विहारी- भारतीय संघाला तिसऱ्या क्रमांकावर जर काही वेगळा प्रयोग करायचा असेल तर त्यांना हनुमा विहारीचा पर्याय उपलब्ध असेल. हनुमा विहारीला कसोटी विशेषज्ञ फलंदाज मानले जातात. तो मोठी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. आजवर त्याने १२ कसोटी सामन्यात ३२.८४ च्या सरासरीने ६२४ धावा काढल्या आहेत. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला आत्तापर्यंत सातत्याने एकाच फलंदाजी क्रमांकावर संधी दिल्या गेली नाही. मात्र आता पुजाराच्या जागी संघ व्यवस्थापन त्याला तिसऱ्या क्रमांकावर आजमावून पाहू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी क्रिकेटचे सम्राट न्यूझीलंडला टक्कर देण्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडला संघ, कोहली-रहाणेला वगळले

एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी चौदा वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू

पदार्पणातच द्विशतक झळकलेल्या किवी फलंदाजाला लागणार लॉटरी? ‘हे’ आयपीएल संघ खरेदीसाठी उत्सुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---