क्रिकेटविश्वात भारताला कौशल्यवान खेळाडूंची खाण समजले जाते. भारतात अनेक दिग्गज खेळाडूंनी जन्म घेतला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. काही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, तर काही खेळाडूंनी संधी मिळत नाही म्हणून देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
काही खेळाडू असे आहेत ज्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळून झाल्यानंतर दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय घेतला, तर काही खेळाडू असे देखील आहेत, ज्यांचा जन्म भारतात झाला, पण ते लहानपणीच कुटुंबासह देश सोडून गेले. तसेच काही खेळाडू असे आहेत, ज्यांचा जन्म विदेशात झाला, पण त्यांचे पालक भारतीय आहेत.
नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मालिकेत न्यूझीलंड संघातील भारतीय वंशाचा गोलंदाज एजाज पटेल (ajaz patel ) याने अप्रतिम कामगिरी केली. एजाज पटेलने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. तसेच रचिन रवींद्रने देखील भारतीय संघाच्या अडचणीत वाढ केली होती. रचिन रवींद्र आणि एजाज पटेलच नव्हे, तर आणखी काही भारतीय वंशाचे दिग्गज क्रिकेटपटू आहेत, पण त्यांनी दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करत भारतीय संघाच्या अडचणीत वाढ केली आहे.
१) माँटी पानेसर – इंग्लड संघाचे प्रतिनिधित्व केलेला माँटी पानेसर या यादीत आहे. इंग्लंड संघाचा दिग्गज गोलंदाज माँटी पानेसर (Monty Panesar). २०१२ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला इंग्लंडने भारतात पराभूत करण्यात माँटी पानेसरने मोलाची भूमिका बजावली होती. मायदेशात हा भारतीय संघाचा शेवटचा पराभव होता. त्यानंतर भारतीय संघाने एकही मालिका गमावली नाहीय.
माँटी पानेसरचा जन्म इंग्लंडच्या लुटॉनमध्ये झाला होता. परंतु त्याचे आई-वडील पंजाबचे होते. त्यानंतर ते लुटॉनमध्ये स्थायिक झाले होते. तिथेच माँटी पानेसरने आपले शिक्षण पूर्ण केले. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याने क्लब क्रिकेट खेळत नॉर्थम्पटनशायर संघात स्थान मिळवले होते. त्यांनतर अप्रतिम कामगिरी करत त्याने २००६ मध्ये इंग्लंड संघात स्थान मिळवले होते. त्याने २०१३ पर्यंत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले.
त्याने २०१२ मध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने मुंबईच्या मैदानावर ११ गडी बाद केले होते. तर मालिकेतील ३ कसोटी सामन्यात १७ गडी बाद केले होते.
२) ईश सोढी – न्यूझीलंड संघाचा फिरकीपटू ईश सोढी (Ish Sodhi) देखील या यादीत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवण्यात अपयश येत आहे. २००३ नंतर विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाला एकही सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभूत करण्यात यश आले नव्हते. २०१९ विश्वचषक, २०२१ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि २०२१ टी२० विश्वचषक स्पर्धेत हे संघ आमने सामने आले. परंतु, या तीनही वेळेस भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान भारतीय फलंदाजांना ईश सोढीने सर्वाधिक जास्त भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले आहे.
ईश सोढीचा जन्म पंजाबच्या लुधियानामध्ये झाला आहे. परंतु, वयाच्या चौथ्या वर्षी त्याचे कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झाले होते. ईश सोढीने नेहमीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ केली आहे. नुकताच झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत ईश सोढीने भारतीय संघाविरुद्ध गोलंदाजी करताना १७ धावा देत २ गडी बाद केले होते. तर २०१६ टी२० विश्वचषक स्पर्धेत १८ धावा देत ३ गडी बाद केले होते. त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीत भारतीय संघाविरुद्ध १९ गडी बाद केले आहेत.
३) हाशिम आमला – या यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला (Hashim Amla) आहे. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. परंतु, अनेकांना ही बाब माहीत नसेल. हाशिम आमलाचे वडील मूळचे गुजरातचे आहेत. त्यानंतर त्यांनी डरबनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. तिथेच हाशिम आमलाचा जन्म झाला.
त्याने वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय संघाविरुद्ध पदार्पण केले होते, तर २००८ मध्ये त्याने भारतीय संघाविरुद्ध १५९ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने २५३ धावांची अप्रतिम खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिका संघाला एक डाव आणि ६ गडी राखून विजय मिळवून दिला होता.
४) नासीर हुसेन – इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन (Nasir Hussain) याचे नाव ऐकून देखील तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल. पण, नासीर हुसेनचा जन्म मद्रास (चेन्नई) मध्ये झाला होते. त्यानंतर त्याचे वडील रजा जावेद त्याला इंग्लंडला घेऊन गेले होते. रजा जावेद यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मद्रासचे प्रतिनिधीत्व केले आहे. परंतु, प्रशिक्षक म्हणून त्यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला होता.
नासीर हुसेनने अनेकदा भारतीय गोलंदाजांना अडचणीत टाकले आहे. त्याने भारतीय संघाविरुद्ध ११५ धावांची खेळी करत इंग्लंड संघाला ३३४ धावांचा डोंगर उभारून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने आपली कारकिर्दीत ५ हजार पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. आता तो सध्या समालोचकाची भूमिका पार पाडतोय.
महत्वाच्या बातम्या –
लाईव्ह सामन्यात जेव्हा विराट कोहलीने घेतली कॅमेरामॅनची फिरकी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
क्षेत्ररक्षण करताना एजाजचा स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद, व्हिडिओ व्हायरल
‘फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी अगरवालच्या फलंदाजीतून घेतला धडा’, न्यूझीलंडच्या अर्धशतकवीराचा खुलासा