26 नोव्हेंबर 2008 ही तारिख कोणताही भारतीय नागरिक कधीही विसरु शकत नाही. याच दिवशी पाकिस्तानी अंतकवाद्यांनी मुंबई शहरावर हल्ला केला होता. 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या हल्ल्यात 175 निर्दोष नागरिकांसह 9 आतंकवादी मारले गेले. या हल्ल्याचा एक मोठा परिणाम झाला. बीसीसीआयने टीम इंडियाचा दोन महिन्यांवर आलेला पाकिस्तान दौरा रद्द केला. भारतीय संघ या दौऱ्यात एक टी20 सामना, 5 वनडे व 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होते. दौरा तसा दोन अडीच महिन्यांचा होता. टीम इंडियाची धुरा तेव्हा एमएस धोनीच्या हातात होती. यानंतर लगेचच पाकिस्तानने शक्कल लढवून श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मनावले. तेव्हा श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होता विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा. श्रीलंकेचं एक शिष्टमंडळ पाकिस्तानात आलं व त्यांनी पाकिस्तानातील स्टेडियमची पाहाणी करुन सिक्युरिटी क्लेअरन्स दिला. रणतुंगाला कोणती घाई होती माहित नाही परंतू यामुळे आपल्याच देशातील खेळाडूंचा जीव जाऊ शकतो याची पुसटशी कल्पनाही रणतुंगाला नव्हती. ठरलं तर. लंकेने 3 वनडे व 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला तात्काळ परवानगी दिली.
14-15 जानेवारी 2009 रोजी श्रीलंका संघ कोलंबोवरुन पाकिस्तानात पोहचला. 20 जानेवारीला मालिकेला सुरुवात झाली. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गमावल्यावर शेवटचे दोन सामने जिंकत श्रीलंकेने मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी 17-18 फेब्रुवारी दरम्यान एक सामना झाला. तो अध्यक्षीय संघाने जिंकला. मग सुरु झाली ती कसोटी मालिका. पाकिस्तानातील खेळपट्ट्या तेव्हा बऱ्यापैकी पाटा होत्या. धावांचे डोंगर उभे राहात होते. पहिला कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर झाला. लंकेने नाणेफेक जिंकत पहिली बॅटिंग केली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकन संघाने तब्बल 644 धावा केल्या आणि डाव घोषीत केला. नंतर बॅटिंगला आलेल्या पाकिस्तानने ताबडतोड उत्तर देत 765 धावा केल्या. लंकेकडून माहेला जयवर्धने आणि थीलन समरवीराने द्विशतके केली तर पाकिस्तानकडून युनिस खानने त्रिशतक केले. एकाच कसोटीत दोन कॅप्टननी 200 पेक्षा जास्त धावा करायची ही इतिहासातील पहिलीच वेळ. शेवटच्या दिवशी लंकेच्या दुसऱ्या डावात 144 धावा झाल्यावर मॅच ड्रा झाली आणि क्रिकेटच्या इतिहासात काळा दिवसाची सुरुवात झाली. कराची हे समुद्रकिनारी असलेलं शहर तर लाहोर अगदी आपल्या पंजाब राज्याशेजारी असलेलं पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतातील शहर. दोन्हीत अंतर बाराशे किलोमीटर एवढं. लंका संघ दौऱ्यातील शेवटच्या सामन्यासाठी विमानाने कराचीहून लाहोरला आला.
पाकिस्तानात भारतासारखेच क्रिकेट फॅन खूप आहेत. कराचीसारखंच लाहोरचं वातावरण भारवलेलं होतं. पाकिस्तानात कसोटी पाहाण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गद्दापी स्टेडियमवर येतात. मॅचचं तिकीटंही कमी असतं. तीन दिवसांची विश्रांती घेऊन १ मार्च रोजी दुसऱ्या कसोटीतील पहिला बॉल टाकला गेला. पाकिस्तानला आपल्या गोलंदाजांवर फुल विश्वास होता. टॉस जिंकल्यावर कर्णधार युनिस खानने बॉलींगचा डिसीजन घेतला. परंतू तेव्हा त्याला कुठे माहित होतं की आपल्या संघातील सगळ्या टीममेट्सला पहिल्या डावात बॅटिंगसुद्धा मिळणार नाही की ज्या पीचवर तो टॉसला गेलाय तिथं दोन दिवसांत पाकिस्तान आर्मीचं हेलीकॉप्टर उतररावं लागेल. पुसटशीही कल्पना नसलेले खेळाडू दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी जीवतोड खेळ करत होते. लंकेने थीलन समरवीराचं द्विशतक, कुमार संगकारा व तिलकरत्ने दिलशानच्या शतकाच्या जोरावर दोन दिवसांत तब्बल 606 धावा झोडल्या. दुसऱ्या दिवसाच्या 25 ओव्हर बाकी असताना पाकिस्तान संघ बॅटिंगला आला अन् दुसऱ्या दिवसाखेर 1 बाद 110 धावा करुन दोन्ही टीमचे खेळाडू हॉटेलकडे रवाना झाले.
अखेर तो दिवस उगवलाच, ज्याला क्रिकेटच्या दिडशे वर्षांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून ओळखले गेले. तो दिवस होता 3 मार्च 2009. लाहोर कसोटीचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होणार होता सकाळी 10 वाजता. पाकिस्तान-श्रीलंका संघ हॉटेलमधून सव्वाआठच्या आसपास निघाले. तसं हॉटेल व गद्दापी स्टेडियम यांच्यात फारसं अंतर नव्हतं. परंतू खेळाडू सामन्याच्या आधी थोडा सराव करतात, तसेच ट्राफिक किंवा इतर कोणती समस्या येऊ नये म्हणून मैदानात लवकर येतात. संघाची बस हॉटेलवरुन निघाली होती. बरोबर सुरक्षेसाठी 2 पोलीस व्हॅन होत्या. याच्या पाठीमागे अंपायरची गाडी होती. ज्यात दिग्गज पंच सायमेन टफेल, पाकिस्तानी पंच एहसान रझा, मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड व इतर अधिकारी बसले होते. गाडी लाहोरच्या ऐतिहासिक लिबर्टी चौकात आली. या चौकातून गद्दापी स्टेडियमचे अंतर जेमतेम 1-2 किलोमीटर आहे. पाकिस्तानच्या घड्याळात काटे सकाळच्या 8 वाजून 40 मिनीटांवर आले होते. भारतात सकाळीचे 9 वाजून 10 मिनीट झाले होते. याचवेळी रस्त्यावर जे घडले त्याचा कुणी विचारही केला नसेल. लिबर्टी चौकात गोळ्या फायर केल्याचा आवाज येऊ लागला. खेळाडूंची बस तेव्हा मेहर मोहम्मद खलील नावाचा ड्रायव्हर चालवत होता. खलीलला वाटले की खेळाडू बसमधून जातायेत म्हणून फॅन्स फटाके वाजवत आहेत. परंतु थोडं पुढे गेल्यावर सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. कुर्ता पायजमा घातलेला व हातात एके 47 असलेला एक अतंकवादी थेट बसच्या समोर आला व फायर करु लागला. याचवेळी लंकन खेळाडू एवढ्या जोरात ओरडले की विचारु नका. ते ड्रायव्हरला सांगत होते की बस पळवं. त्यानेही कोणताही विचार न करता बस पळवायला सुरुवात केली. आतंकवाद्यांनी लगेच जवळचा हॅंड ग्रेनेड फेकला. परंतू तो फुटण्याच्या आधीच बस पुढे गेली होती. मग त्यांनी रॉकेट लॉंचरने हल्ला केला. परंतू त्याचा नेम चुकला. ड्रायव्हरने बस थेट गद्दापी स्टेडियममध्ये घातली. तोपर्यंत मागच्या गाडीत असलेल्या अंपायर्सवरही हल्ला झाला. त्यात पाकिस्तानचे पंच एहसान रझा यांच्या पोटात एक व खांद्याला एक गोळी लागली. तोपर्यंत पोलीस व्हॅन मधील पोलीस कर्मचारी व अंतकवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली.
जेव्हा अंतकवाद्यांनी खेळाडूंच्या गाडीवर हल्ला केला तेव्हा यात लंकेचे पाच खेळाडू जखमी झाले होते. त्यात कुमार संगकारा, जो तेव्हा व्हाईस कॅप्टन होता तो, अंजंठा मेंडिस, चामिंडा वास, थीलन समरवीरा आणि थरंगा परनविताना हे जखमी झाले होते. यातही थीलन समरवीरा व थरंगा परनविताना जास्तच जखमी झाले होते. जर ही सिरीज पुर्ण झाली असती तर समरवीराला डोळे झाकून मॅन ऑफ सिरीज मिळाली असती. परंतू त्याला क्रिकेट खेळण्याचे वेगळेच बक्षीस मिळाले होते. संघाचा कॅप्टन माहेला जयवर्धने मात्र या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. जवधर्नेला प्रवासात बाहेरचा व्हुव पाहायची सवय आहे. यावेळीही तो काचेतून लाहोर पाहाता येईल असाच बसला होता. त्यामुळे गोळी त्याच्या कानाजवळू चाटून गेली. तो जर बाहेरचे दृश्य पाहात नसता तर कदाचीत गोळीने त्याचा वेध घेतला असता. यावेळी सुरुवातीला ज्या बातम्या आल्या त्यात लंकन खेळाडूंनी जीव गमावल्याचीही बातम्या होत्या. त्या नंतर सुदैवाने खोट्या ठरल्या.
दुसऱ्या गाडीत असलेले सायमन टफेल (Simon Taufel) व इतर अंपायर देखील खूपचं थोडक्यात वाचले. सायमन टफेल यांनी आपल्या जीवनावर आधारीत फाईडिंग गॅप नावाचे पुस्तक लिहीले आहे. त्यात या प्रकरणावर त्यांनी एक चाप्टर लिहीला आहे. ते म्हणतात, मी थोडीशी अंधश्रद्धा मानतो. मी जेव्हा मॅचसाठी जातो, तेव्हा मी कधीही सीट बदलत नाही. परंतू त्या दिवशी मात्र मी माझी जागा पाकिस्तानी पंच एहसान रझा यांना दिली व मी दुसऱ्या सीटवर बसलो. आतंकवाद्यांच्या हल्ल्यात एहसान रझा यांच्या खांद्याला व पोटाला गोळी लागली.
जेव्हा एहसान रझांना गोळी लागली तेव्हा गाडीत असलेल्या मॅच ऱेफ्री यांनी त्यांना खाली पाडून अंगावर झोपले. जेणेकरुन जास्त ब्लिडींग होणार नाही. परंतू रझा यांना यामुळे श्वासच घेता येईना. त्यांनी कसंबसं ब्रॉड यांना दुर व्हायला सांगितलं. पॉल फॉग्स याच गाडीत होते, ते देखील जखमी झाले होते तर या गाडीच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गाडीत भितीचं वातावरण होतं.
खेळाडूंची गाडी जेव्हा गद्दापी स्टेडियमला पोहचली तेव्हा अनेक लंकन खेळाडू रडत होते. काहींनी तर ड्रायव्हर खलीलला मिठी मारत त्याचे आभार मानले. यानंतर काही वेळातच पाकिस्तान एअरफोर्सचे दोन चॉपर तिथे येतात. खेळाडू पटापट त्यात बसून थेट हॉटेल गाठतात. त्याच दिवशी स्पेशल विमानाने लंकन खेळाडू कोलंबोला रवाना झाले. पुढे लंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपाक्षेंनी आपल्या देशाचे स्पोर्ट्स मिनीस्टरलला पाकिस्तानात पाठवून घटनेची माहिती घेतली. या हल्ल्यामागे लष्करे जहांगवी नावाची संघटना होती. त्यांना खेळाडूंवर हल्ला करायचा होता व काही खेळाडूंना किडनॅप करुन त्यांच्या मागण्या मान्य करायच्या होत्या. परंतू हे शक्य झालं नाही. पुढे पाकिस्तानमधील पंजाब राज्याच्या सरकारने यावर कमिशन बसवलं. कमिशनचा रिपोर्ट धक्कादायक होता. त्यात हॉटेल ते गदापी स्टेडियमच्या रुटची रेकी केली नसल्याचे समोर आले. तसेच कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तान इंटेलिजन्सचा हे सर्वात मोठं फेल्युअर होतं हे.
या संपुर्ण घटनेत 6 पाकिस्तानी पोलीस, 2 पाकिस्तानी नागरिक व मिनी व्हॅनचा ड्रायव्हर मृत्यमुखी पडले. खेळाडूंच्या बस ड्रायव्हरला पुढे लंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षेंनी सन्मानित केले. यानंतर मात्र 6-7 वर्ष पाकिस्तानात कोणताही संघ खेळण्यासाठी आला नाही. अनेक संघांनी पाकिस्तान दौऱ्यावर जायला नकार दिला. पाकिस्तानचे त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सामने अनेक वर्ष युएईमध्ये झाले. अगदी पाकिस्तान प्रीमीयर लीग देखील युएईत झाली.
22 मे 2015 मात्र पाकिस्तानसाठी सोन्याचा दिवस ठरला. कारण याच दिवशी झिंबाब्वे संघाने पाकिस्तानात तब्बल 6 वर्षांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर याच गद्दापी स्टेडियमवर 29 ऑक्टोबर 2017 रोजी श्रीलंका व पाकिस्तान संघात टी20 सामना झाला. त्याच मैदानावर त्याच दोन देशांत सामना खेळवून दोनही संघांनी दाखवून दिले की क्रिकेट ही मोठी भावना आहे. खेळभावनेपेक्षा काहीही मोठं नाही. सध्या भारत सोडून जवळपास सर्वच प्रमुख संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे. तर मित्रांनो हा होता क्रिकेट इतिहासातील सर्वात काळा दिवस.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रबाडाच्या तुफानी गोलंदाजीने सेंच्युरियन कसोटी तीन दिवसांत निकाली! वेस्ट इंडीजचा दारुण पराभव
लय भारी! अफलातून झेल टिपत कॅप्टन स्मिथने दाखवला पुजाराला तंबूचा रस्ता, पाहा तो व्हिडिओ