भारतीय महिला क्रिकेट संघावर शनिवारी (30 डिसेंबर) मान खाली घालण्याची वेळ आली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारताला मात दिली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी जिंकला. एनाबेल सदरलँड सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. 259 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या भारतासाठी रिचा घोष हिने अप्रतिन खेळी केली, पण तिची एकाकी झुंज संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. परिणामी ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 0-2 अशी विजयी आघाडी मिळवली.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 258 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 255 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या षटकात भारताला जिंकण्यासाठी 16 धावा हव्या होत्या. पण खेळपट्टीवर असणाऱ्या दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटील संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
भारतासाठी या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष सर्वाधिक धावांचे योगदान देऊ शकली. रिचाच्या शतकाला अवघ्या चार धावा कमी असताना एनाबेल सदरलँड हिने तिला फिबी लिचफिल्डच्या हातात झेलबाद केले. रिचाने 117 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 96 धावांपर्यंत मजल मारली. जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 55 चेंडूत 44 धावांची योगदान दिले. त्याआधी सलामी फलंदाज यास्तिका भाटिया आणि स्मृती मंधाना यांनी अनुक्रमे 14 आणि 34 धावांवर विकेट्स गमावल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली कर्णधार हरमनप्रीत कौर 10 चेंडूत अवघ्या 5 धावा करून एलिसा हिलीच्या हातात झेलबाद झाली.
गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्मा हिने फलंदाजीमध्ये 36 चेंडूत 24* धावांचे योगदान दिले. अमनजोत कौर 4, पूजा वस्त्राकर 8 आणि हरलीन देओल 1 धाव करून बाद झाली. श्रेयांका पाटीलने 5* धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी एनाबेल सदरलँडने 9 षटकांमध्ये 47 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जॉर्जिया वेयरहम हिने 7 षटकांमध्ये 39 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. ऍशले गार्डनर, किम गार्थ, अलाना किंग यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर फिकी लिचफिल्ड हिने सर्वाधिक 63, तर एलिस पेरी हिने 50 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी दुसरी एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकली नाही. भारतासाठी दीप्ती शर्मा हिने ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. यासाठी तीने 10 षटके गोलंदाजी केली आणि 38 धावा खर्च केल्या. दीप्ती भारताची पहिली महिला गोलंदाज ठरली आहे, जिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात विकेट्सचे पंचक घेतले आहे. पूजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट नावावर केली.(Australia won the 2nd ODI by a narrow margin of 3 runs against India)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, स्नेह राणा, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, पूजा वस्त्राकर.
ऑस्ट्रेलिया – एलिसा हिली, फिबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, थासला मॅकग्रा, एशले गार्डनर, एनाबेल सदरलँड, जाॅर्जिया वेयरहम, अलाना किंग, किम गार्थ, डार्सी ब्राऊन
महत्वाच्या बातम्या –
भारताची डोकेदुखी वाढली; दुसऱ्या कसोटीतून अष्टपैलू माघार घेण्याची शक्यात, सराव करताना दुखापत
IND vs AUS । ऑस्ट्रेलियासाठी वरच्या फळीतील फलंदाजांची अर्धशतके, दीप्ती शर्माचे विकेट्सचे पंचक