मुंबई । गेल्या महिन्यात कोरोनाव्हायरस संक्रमित आढळलेला चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) फलंदाज ऋतूराज गायकवाड अजूनही क्वारंटाइनमध्ये आहे. 19 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन सांगितले की, “ऋतूराज ठीक आहेत, पण संघाच्या जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात परत येण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) परवानगी अद्याप त्याला मिळाली नाही.”
ते म्हणाले, “ऋतूराजला अद्याप बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मान्यता दिली नाही आणि तो अजूनही क्वारंटाइनमध्ये आहे. पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. आम्ही पुढील काही दिवसांत त्याच्या जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात परत येण्याची आशा करतो आणि तो पूर्णपणे ठीक आहे.”
सीएसके संघातील 13 सदस्य मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यात ऋतुराज आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचा समावेश आहे. चाहर व इतर 11 जण आजारातून बरे झाले आहेत. दोन वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चाहरने प्रशिक्षण सुरू केले आहे.
ऋतुराजच्या रविवारी आणि सोमवारी दोन कोरोना टेस्ट झाल्या आहेत. मात्र, याचा अहवाल काय आला आहे , हे कळाले नाही. ऋतुराज संघात सुरेश रैनाचा पर्याय होता, जो वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतला. तसेच अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगही वैयक्तिक कारणास्तव या स्पर्धेत खेळत नाही. पण संघाने अद्याप त्यांच्या पर्यायांविषयी निर्णय घेतलेला नाही.