शुक्रवारी (९ जुलै) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात टी२० मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिलांना १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू हरलीन देओलने घेतलेल्या अफलातून झेलाने सर्वांचीच मनं जिंकली आहे. तिच्या झेलाचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सामन्य क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील तिचे कौतुक केले आहे. याबद्दल हरलीनने त्याचे आभार मानताना त्याच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण करण्याची प्रेरणा मिळाल्याचे तिने म्हटले आहे.
हरलीनचा अफलातून झेल
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली होती. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना १९ व्या षटकात तुफानी फटकेबाजी करत असलेल्या एमी ऍलेन जोन्सने शिखा पांडेच्या चेंडूवर डीपमध्ये शॉट खेळला होता. सर्वांना वाटले होते की, तो चेंडू आरामात सीमारेषेच्या बाहेर जाईल. परंतु हरलीन देओलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला.
हरलीनने सीमारेषेजवळ उंच उडी मारत आधी झेल टिपला. त्यानंतर तिला लक्षात आले की, तिचा तोल जाऊन ती सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकते. त्यावेळी तिने चेंडू हवेतच उंच उडवला आणि सीमारेषेच्या बाहेर गेली. त्यानंतर पुन्हा मैदानात येताना तिने डाईव्ह मारत चेंडू झेलला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रैनाने केले कौतुक
हरलीनच्या या झेलाचा व्हिडिओ रैनाने ट्विटरवर शेअर करत कौतुक केले आहे. त्याने लिहिले की ‘हे शानदार आहे. अविश्वसनीय झेल. हरलीन देओल तुझा देशाला अभिमान आहे. अशीच चमकत राहा आणि दुसऱ्यांना प्रेरणा देत राहा.’
This is terrific, what a brilliant catch @imharleenDeol Way to go, the country is so proud of you! Keep shining & inspiring others #INDvENG pic.twitter.com/M5qvL8SPl8
— Suresh Raina???????? (@ImRaina) July 10, 2021
रैनाच्या या ट्विटला उत्तर देताना हरलीनने लिहिले की ‘धन्यवाद, रैना सर. मी जेव्हा लहान होते, तेव्हा क्षेत्ररक्षणातील उच्च पातळी गाठण्यासाठी तूम्ही माझ्यासाठी प्रेरणा होता.’
Thanku @ImRaina sir so much..u have been my inspiration for achieving higher levels in fielding when I was younger…thank you ????????????????
— Harleen Kaur Deol (@imharleenDeol) July 10, 2021
रैना देखील क्रिकेटमधील चपळ आणि उत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणला जातो.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघ करत असताना ९ व्या षटकादरम्यान पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबला. त्यावेळी भारताने ३ बाद ५४ धावा केल्या होत्या. पावसामुळे पुढे खेळ झाला नसल्याने इंग्लंड महिला संघाला डकवर्थ लूईस नियमानुसार विजेता घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी मी झहीरला शिव्या दिल्या की मला सलामीवीर बनवलं, पण आज…’, सेहवागने केला खुलासा
इंग्लंड-भारत मालिकेच्या पहिल्या सामन्यातून आणखी एक क्रिकेटपटू बाहेर