भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना भारताने तब्बल ११३ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र असे असले तरी, विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे.
सेंच्यूरियन (Centurion) येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत १ षटकाची गती कमी राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय संघावर कारवाई केली आहे. आयसीसीने (ICC) केलेल्या कारवाईनुसार भारतीय संघाचे २० टक्के सामना शुल्क कापले जाणार आहे. याशिवाय ही मालिका कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग असल्याने भारतीय संघाचा गुणतालिकेत १ गुणही कमी केला जाणार आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार खेळाडू आणि संघांसाठी असलेल्या अचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार जर कोणताही संघ नियमित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही, तर खेळाडूंवर उशीर झालेल्या प्रत्येक एका षटकासाठी २० टक्के सामना शुल्काचा दंड करण्यात येतो. त्याचबरोबर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नियमानुसार एक षटकाची गती कमी राखल्यास (slow over-rate) १ गुण कापला जातो. या नियमांनुसार भारतीय संघावर एका षटकाची गती कमी राखल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आरोप स्वीकारले असल्याने याबद्दल कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.
अधिक वाचा – नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला असल्याने भारताचे ५४ गुण झाले होते. पण गुण आता कमी करण्यात आल्याने ५३ गुण झाले असून ६३.०९ विजयाची टक्केवारी आहे. सध्या भारतीय संघाचे गुणतालिकेत सर्वाधिक गुण आहेत. मात्र, गुणतालिकेत संघाचे स्थान विजयाच्या टक्केवारीनुसार निश्चित केले जात असल्याने भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
या गुणतालिकेत विजयाच्या १०० टक्के सरासरी आणि ३६ गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे. तसेच त्यापाठोपाठ श्रीलंका असून त्यांचीही विजयाची टक्केवारी १०० आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. त्यांची ७५ टक्के विजयाची सरासरी आहे.
भारतीय संघाने आत्तापर्यंत कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेत ७ सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहेत, तर १ सामना पराभूत झाला आहे. तसेच २ सामने अनिर्णीत राहिले आहेत. या स्पर्धेच्या नियामानुसार जिंकलेल्या सामन्यासाठी १२ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण आणि बरोबरी झालेल्या सामन्यासाठी ६ गुण मिळतात. तसेच पराभूत संघाला एकही गुण मिळत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
विरेंद्र सेहवागच्या बहीणीचा आम आदमी पार्टीत प्रवेश , वाचा पक्षप्रवेशाचे कारण
शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…! टीम इंडियावर आजी-माजी दिग्गजांकडून पडतोय कौतुकाचा पाऊस
अर्जुन तेंडुलकरला का मिळाली मुंबई रणजी संघात स्थान, मुख्य निवडकर्त्यांनी दिले स्पष्टीकरण
व्हिडिओ पाहा –