राजकोट। आज(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) येथे पार पडणार आहे. सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या संघात बदल होण्याचे संकेत भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा दिले आहेत.
रोहित दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी म्हणाला, ‘आमची फलंदाजी चांगली दिसते. त्यामुळे आम्हाला आमच्या फलंदाजीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. आम्ही खेळपट्टीचे मूल्यांकन करू आणि त्या आधारे आम्ही संघ म्हणून आपण काय करू शकतो ते पाहू.’
‘मागच्या सामन्यात आम्ही जे गोलंदाज खेळवले होते ते दिल्लीच्या खेळपट्टीवर आधारित होते. आम्ही आज पुन्हा खेळपट्टी पाहू आणि गोलंदाजी फळीमध्ये काय बदल करायला हवे त्याचा विचार करू.’
खेळपट्टीबद्दल रोहित म्हणाला, ‘खेळपट्टी चांगली दिसत आहे. फलंदाजीसाठी राजकोटच्या मैदानावरील खेळपट्टी चांगली ठरली आहे आणि तसेच ही खेळपट्टी गोलंदाजांनाही थोडी मदत करते. ती चांगली खेळपट्टी असेल. मला विश्वास आहे की दिल्लीपेक्षा ही खेळपट्टी चांगली असेल.’
रणनीतीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, ‘मी तुम्हाला रणनीती सांगू शकत नाही परंतु, आमच्या रणनीतीमध्ये काही बदल असू शकतात. शेवटच्या सामन्यात आम्ही खेळपट्टीनुसार खेळलो. खेळपट्टी जशी होती त्यानुसार आम्ही खेळत होतो.’
आम्ही आमच्या चुकांवर लक्ष केंद्रित करू आणि या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष देऊ, असेही रोहित म्हणाला.