येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. या सामन्यात भारतीय संघ हा सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारतीय संघ एक मजबूत संघ म्हणून दिसून येत आहे. ही स्पर्धा दोन्ही संघासाठी तितकीच महत्वाची आहे. परंतु भारतीय संघाने गेल्या काही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
चला तर पाहूया, अशी प्रमुख कारणे ज्यावरून स्पष्ट होते की भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो.
१) संघ चांगल्याच फॉर्ममध्ये : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच ऑस्ट्रेलिया संघाला ३-१ ने पराभूत करत भारतीय संघाला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला होता. या मालिकेत वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. अशा कठीण काळात युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील विजयाच्या दृष्टीने मैदानात उतरेल.
२) साउथॅम्प्टनमध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी साउथॅम्प्टनचे मैदान गाजवले आहे. विराटने या मैदानावर आतापर्यंत चार डावात १७१ धावा केल्या आहेत. तर रहाणेने ४ डावात १६८ धावा चोपल्या आहेत. अशी आकडेवारी राहिल्यास या दोन फलंदाजांचा आत्मविश्वास आणखी वाढेल, जो संघासाठी खूप उपयुक्त ठरेल.
३) फलंदाजी मध्ये खोली : भारतीय संघ या मोठ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. संघातील सर्व खेळाडू फिट आहेत. तसेच सलामी फलंदाजापासून ते गोलंदाज देखील संघासाठी धावा करू शकतात. या संघातील सर्वच फलंदाज सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत हे आक्रमक फलंदाज कुठल्याही गोलंदाजी क्रमाला उध्वस्त करू शकतात.
४) वेगवान गोलंदाजी : भारतीय संघात वेगवान गोलंदाजांची खाण आहे. वरिष्ठ गोलंदाज तर चांगली कामगिरी करतच आहेत. तसेच युवा गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात युवा गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली होती. तसेच या मोठ्या सामन्यात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांची तिकडी मैदानात उतरू शकते. हे तिघेही कुठल्याही फलंदाजी फळीला ढासळू शकतात. म्हणूनच भारतीय संघ या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गजांच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूंकडे आहे टीम इंडियात जागा पक्की करण्याची संधी
भविष्यातील स्टार! मिडल स्टंपने फलंदाजी करणाऱ्या ९ वर्षीय चिमुकल्याच्या मदतीला आला ‘हा’ आयपीएल संघ
टीम इंडिया सज्ज, ‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा चोपणारे ३ भारतीय फलंदाज