शुक्रवारी बीसीसीआयने (७ मे) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला. या संघात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकतर खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. या संघात स्थान देण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसमोर अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणाला स्थान द्यावे? हा मोठा प्रश्न पडला असेल.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही २०१९ मध्ये सुरू झाली होती. गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघामध्ये खेळवला जाणार आहे. साउथम्पटन येथील द रोज बाउल स्टेडियमवर हा महत्त्वाचा सामना रंगणार आहे.
या स्पर्धेत एकूण ९ संघ सहभागी होते. प्रत्येक संघाला ६-६ कसोटी मालिका खेळायच्या होत्या. परंतु २०२० मध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे अनेक कसोटी मालिका रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरासरी गुण काढून अंतिम दोन संघ निवडण्यात आले होते. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड संघाने बाजी मारली होती.
रोहित-शुबमनवर असेल चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी
गेल्या काही महिन्यांमध्ये शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी भारतीय संघाला अनेकदा चांगली सुरुवात करून दिली आहे. शुबमन गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वी शॉऐवजी संघात सलामी फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. त्या संधीचे सोने करत त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच कामगिरीची जोरावर त्याची इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. ज्यामध्ये त्याला धावा करण्यात अपयश आले होते.
त्यामुळे या मोठ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्याने आतापर्यंत एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ३७८ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने ३ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच रोहित शर्माने आतापर्यंत एकूण ३८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २६१५ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने १२ अर्धशतक आणि ७ शतक झळकावले आहेत.
त्रिमूर्तीवर असेल मोठ्या धावा करण्याची जबाबदारी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून शतक झळकावण्याचा प्रतीक्षेत आहे. तो शतकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. परंतु शतक झळकावण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे चाहते त्याच्याकडून या सामन्यात शतक झळकावण्याची अपेक्षा करत आहेत. त्याने आतापर्यंत एकूण ९१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ७४९० धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने २५ अर्धशतक आणि २७ शतक झळकावले आहेत. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर देखील मधल्या फळीत संघाला मोठ्या धावसंख्या उभारून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
रिषभ पंतच्या कामगिरीवर असेल सर्वांचे लक्ष
युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आहेत. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या मोठ्या सामन्यात देखील त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
जडेजाचे होऊ शकते पुनरागमन
अंतिम सामन्यासाठी रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या जडेजाला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. त्यानंतर त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेतून जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे या मोठ्या सामन्यातही त्याला संधी दिली जाऊ शकते. अशात अनुभवी अष्टपैलू आर अश्विनचे स्थान धोक्यात येऊ शकते. कारण संघात दोघांपैकी कोणत्या एकाच अष्टपैलूला जागा देता येईल. अशात कर्णधार कोहली जडेजाला प्राधान्य देऊ शकतो.
शमीलाही मिळू शकते संधी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला मोहम्मद शमी पुनरागमन करू शकतो. तसेच ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर किवी फलंदाजांना लवकर बाद करून माघारी धाडण्याचे आव्हान असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही या संघात स्थान मिळू शकते.
असा असू शकतो भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार) चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्ष), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
आधी वाढलेलं वजन कमी कर, मग निवडीचा विचार करू; बीसीसीआयचा ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला इशारा