आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. यावर्षी एप्रिल-मे दरम्यान झालेल्या आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यामध्ये बायो बबलमधील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली होती. या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगली कामगिरी केली होती. आता हीच कामगिरी कायम ठेवण्यासाठी काय करावे, याबद्दल स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने मत मांडले आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सर्वक्षेष्ठ प्रदर्शन द्यावे लागेल, असे स्मिथने सांगितले आहे.
स्मिथच्या मते रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघात यूएईत खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अजून चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता आहे.
तो म्हणाला,”आम्हाला आमचे अभियान तेथूनच सुरू करावे लागेल जेथे आम्ही पहिल्या टप्प्यात संपवले होते. आम्ही चांगले क्रिकेट खेळत होतो आणि त्यामुळे चांगले परिणामही मिळाले होते. मला वाटते की आम्ही आणखी चांगले करू शकतो आणि त्यामुळेच आम्ही स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आमचे सर्वक्षेष्ठ क्रिकेट खेळले पाहिजे.”
दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात २२ सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांच्या अभियानाला सुरुवात करणार आहेत.
स्मिथने सांगितले आहे की, “अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी तुम्हाला खूप चांगले खेळावे लागेल, पण आशा आहे की अंतिम सामन्यात आम्ही आमचे सर्वक्षेष्ठ क्रिकेट खेळू शकू. संघाला नक्कीच आयपीएलसाठी स्वत:ला पुन्हा तयार करावे लागेल. आम्हाला एकत्र खेळलेले काही महिने झाले आहेत, त्यामुळे आम्हाला पुन्हा तयारी करावी लागेल. आमच्याकडे एक अप्रतिम संघ आहे आणि श्रेयस अय्यर देखील आहे, जो संघाला आणखी मजबूत बनवतो. तो चांगला खेळाडू आहे आणि त्याला पुनरागमन करताना पाहणे चांगले आहे.”
यावर्षी आयपीएल स्थगित होण्याआधी दिल्ली कॅपिटल्सने चांगले प्रदर्शन केले आहे. संघाने खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत आणि १२ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर
‘मला टी२० विश्वचषकात खेळवण्याचा शब्द दिला होता, आता संपर्कही साधला नाही’, ताहिरचा आरोप