आयपीएल २०२० ची काही महिन्यांपुर्वीच समाप्ती झाली असून, आता सर्वांच्या नजरा आयपीएल २०२१ कडे लागल्या आहेत. अशात आयपीएल प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ११ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२१ साठीचा लिलाव पार पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (१८ जानेवारी) पार पडलेल्या आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या बैठकीत लिलावाच्या तारखेसंदर्भात चर्चा झाली असल्याचे समजत आहे. तसेच या बैठकीतील निर्णयानुसार बुधवारी संध्याकाळी आयपीएल संघांनी कायम केलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
भारत- इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान होऊ शकतो लिलाव
असे असले तरी, आयपीएल २०२१ च्या खेळाडू लिलावाची तारिख आणि स्थळ याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु अशी चर्चा आहे की, भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा लिलाव आयोजित केला जाऊ शकतो. हे दोन्ही संघ भारतात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान होईल. तर दुसरा सामना १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत होईल.
आठ संघ होणार सहभागी
तसेच प्रसिद्ध क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोमधील वृत्तांनुसार, आयपीएलच्या येत्या हंगामाचा लिलाव ११ फेब्रुवारी रोजी होण्याची संभावना आहे. यावेळी खेळाडूंच्या लिलावाचा कार्यक्रम फक्त १ दिवस होऊ शकतो. पुर्वी बीसीसीआयने या हंगामात १० संघ खेळवण्याची योजना आखली होती. परंतु नंतर बीसीसीआयने २०२२ पासून १० संघांसह आयपीएल खेळण्याचे ठरवले आहे. याचा अर्थ असा होतो की, दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ८ संघ सहभागी होतील.
स्वदेशात आयपीएल २०२१ आयोजनाची शक्यता
याव्यतिरिक्त आयपीएल २०२१ च्या स्थळाविषयी अद्याप बीसीसीआयकडून स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आयपीएल २०२१ चे आयोजन भारतात होईल का परदेशात? यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आलेली दिसत आहे. तसेच कोरोनाची लसही भारतात आली आहे. त्यामुळे मायदेशातच आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूची फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती
आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम
आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम