भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांची ‘लोहपुरुष’ म्हणून सर्वत्र ओळख आहे. सदर्न पंजाब विरोधात त्यांनी ४ निर्धाव षटकं टाकून ४ बळी घेतले होते. त्यांचे संपूर्ण नाव नानिक अमरनाथ भारद्वाज आहे. यांचा जन्म ११ सप्टेंबर १९११ मध्ये झाला होता. विशेष म्हणजे भारताच्या विभाजनानंतरच्या पहिल्या भारत-पाक क्रिकेट मालिकेत लाला अमरनाथ कर्णधार होते व भारताने पाकिस्तानला २-१ अशा फरकाने चित केले व ती मालिका जिंकली.
लाला अमरनाथ हे इतके ख्यातनाम आहेत की त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन २०११ साली एक हिंदी चित्रपट ‘पतियाला हाऊस’ केला गेला होता. अभिनेता अक्षय कुमार याने वेगवान गोलंदाज ‘काली’ याची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात अखेरच्या वेळी एका क्रिकेट सामन्यात कालीची भूमिका निभावणारा अक्षय कुमार लाला अमरनाथ यांच्यासारखी गोलंदाजी शैलीने चेंडू टाकतो.
लाला अमरनाथ फक्त भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार नव्हते. तर निवडकर्ता, मॅनेजर, प्रशिक्षक या सर्व भूमिका त्यांनी उत्तम बजावल्या आहेत. तर पाहूया लाला अमरनाथ यांच्या जीवनातील काही रंजक घटना:
१. तुफानी फटकाबाजी –
लाला अमरनाथ एक आक्रमक फलंदाज देखील होते. त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरत त्यांनी त्यांच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतक केले. १५ डिसेंबर १९३३ साली इंग्लंडविरुद्ध हा सामना झाला होता. त्यांनी केवळ ७८ मिनिटात ८३ धावा केल्या होत्या. ते ११७ मिनिटात शतक पूर्ण करण्यात यशस्वी झाले.हा सामना जरी इंग्लंडने जिंकला असला, तरी त्यांच्या या खेळीमुळे सर्व प्रेक्षकांनी मैदानाकडे धाव घेतली व ‘लाला अमरनाथ’ अशी घोषणा देत सुटले.
२. क्रिकेटला लाभलेले तब्बल ३ सुपुत्र-
लाला अमरनाथ यांनी तीन मुलं होती- मोहिंदर, सुरिंदर व राजिंदर. या तिघांनीही वडीलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली. या तिघांपैकी मोहिंदर व सुरिंदर अमरनाथ यांनी भारताचे प्रतिनिधित्त्व केले. तसेच रजिंदर यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडली. भारताने १९८३ ला पटकावलेल्या विश्वचषक विजेतेपदामध्ये मोहिंदर उर्फ ‘जिमी’ अमरनाथ यांनी एक मुख्य भूमिका बजावली होती.
पण, त्यापूर्वी १९७७ च्या भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यात मोहिंदर यांना टोनी ग्रेगविरुद्ध खेळताना अडचणी येत होत्या. पण या सामन्यादरम्यानच्या विश्रांतीवेळी मोहिंदर यांना वडील लालाजींनी बहुमुल्य सल्ला दिला. ज्यानंतर मोहिंदर यांनी चेंडूची वाट बघत पुढच्या २ चेंडूंवर २ चौकार मारले व अर्धशतक देखील फटकावले. याबरोबरच सुंरिंदर यांच्यासाठीही लालाजींनी फ्रेंटफुटवर खेळण्याचा मोलाचा सल्ला दिला होता, ज्याचा फायदा सुरिंदर यांना झाला.
३. जसू पटेलांची निवड ठरली ट्रम्प कार्ड
साल १९५९ मध्ये निवडकर्त्यांनी स्पिनर जसुभाई पटेल यांना तात्काळ एका कसोटी सामन्यासाठी खेळण्यास बोलावले होते. कारण १९५९ मधल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सपशेल हरवले. दुसरा कसोटी सामना सुरु व्हायच्या आधी सर्वजण गोंधळात पडले होते. त्यामुळे निवड समीतीचे अध्यक्ष लालाजींनी ३५ वर्षीय जसू पटेल यांची निवड केली, जी कोणाला फारशी रुचली नव्हती. स्वतः कर्णधार गुलाबराय रामचंद या निर्णयाच्या विरोधात होते. तरीही लालाजींनी कानपूरच्या टर्फ विकेटचा अंदाज आल्यामुळे कुणाचेही ना ऐकता त्वरित जसू पटेल यांना संघात घेतले.
दुसरा कसोटी सामना देखील भारताच्या पक्षातून निसटत होता, कारण भारताची संपूर्ण फलंदाजी फक्त १५२ धावांवर थांबली. तरीही केवळ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या ३ फलंदाजांनीच धावा काढल्या. जसू पटेल यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाची संपूर्ण मिडल व लोअर ऑर्डर कोलमडली. ६ फलंदाज शुन्यावर बाद झाले. पहिल्या डावात तब्बल ९ बळी घेऊन भारताच्या विजयात जसू पटेल यांनी मुख्य भूमिका बजावली. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या १० विकेट्सच्या आधी जेसू पटेल यांच्या ९ विकेट्सवर सर्वांना अभिमान होता.
४. विजयनगरमच्या महाराजांशी वाद-
बिशन सिंग बेदी यांच्या वक्तव्यानुसार, आक्रमक लालाजींचे महाराजा ‘विजी’ यांच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. परंतु विजी यांच्या बाबतीत हे काही नवीन नव्हते. माजी क्रिकेटपटू सी. के. नायडू यांच्याबरोबर देखील विजींचे भांडण झाले होते. १९३६ च्या इंग्लंड दौऱ्यावर असताना विजींनी लालाजींना सी. के. नायडू यांच्याबरोबर भागीदारी करण्यास मनाई केली. लालाजींनी हे मंजूर करून पुढील सामन्यामध्ये शतक ठोकले व विजी खुश झाले. पण असे असूनही, विजींच्या सहखेळाडूंबरोबरच्या कटू वागण्यामुळे, विजी आणि लाला अमरनाथ यांच्यामध्ये वाद अथवा भांडण होणे अटळ होते.
परंतु भांडणाच्या तुफानाची खरी सुरुवात काउंटी क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये झाली. विजींनी लालाजींना त्यांच्या क्रमावर बॅटिंग करू न दिल्याने, लालाजींनी पॅड्स फेकत विजींना पंजाबीमधील अपमानास्पद शिव्या दिल्या. तेव्हा जरी लालाजींना परत पाठवण्यात आले असले, तरी सर्वांनी विजींचीच घोर निंदा केली.
५. लाला अमरनाथांची कमाल अन् मॅच-फिक्सिंग टळले
लालजींची हुशारी १९५४ च्या पाकिस्तान दौऱ्यावेळी दिसली होती. पाकिस्तानचे कर्णधार अब्दुल करदार यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक लालाजींना बोलावले होते. त्याचवेळी सामन्याचे अंपायर इद्रिस बेग पाकिस्तानच्या कर्णधाराकडून ‘सूचना’ घेण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यांना माहित नव्हते की लाला अमरनाथ त्याच ठिकाणी आहेत. लालजींना पाहून बेग यांनी त्याक्षणी तिकडून पळ काढला. म्हणून लालाजींनी अब्दुल करदार यांना बजावले की बेग या सामन्याचे अंपायरिंग करणार नाहीत. तेव्हा इद्रिस बेग यांच्याशिवाय दुसरे कोणीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अंपायरिंग करण्यास पात्र नव्हते. फक्त एक निवडकर्ते, मसूद सलाउद्दीन, यांनी फर्स्ट-क्लास स्पर्धांमध्ये अंपायरिंग केले होते. पण या सर्व प्रकारामुळे त्या सामन्याचे अंपायर सलाउद्दीन होते व खेळानंतर लालाजींनी सलाउद्दीनच्या अंपायरिंगची प्रशंसादेखील केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
चर्चा आयपीएल मेगा ऑक्शनच्या! २०२२ हंगामासाठी पंजाब किंग्स ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
“तू चेंडूला जास्त स्पिन करतो”, आर अश्विनने मागितलेल्या सल्ल्यावर ‘बापू’चे मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार रद्द? क्रीडामंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान आले समोर