महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. अखेर आजच्याच दिवशी म्हणजेच सन १९६० साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच, १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे.
आज महाराष्ट्र दिनी आपण क्रिकेटमधील असे काही मराठी खेळाडू पाहणार आहोत, ज्यांचा नावलौकिक आणि त्यांनी केलेले अनेक विक्रम-पराक्रम क्रिकेट इतिहासात अजरामर झाले आहेत.
भारतीय क्रिकेटमध्ये जसा महाराष्ट्रातील फलंदाजांचा मोठा वाटा आहे तसाच गोलंदाजांचाही आहे. महाराष्ट्रातील अनेक गोलंदाजांनी भारतीय संघाकडून खेळताना मोठी कामगिरी केली आहे. अशाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या महाराष्ट्रातील गोलंदाजांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे महाराष्ट्रीयन गोलंदाज –
५. सुभाष गुप्ते – मुंबईत जन्मलेल्या सुभाष गुप्ते यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९५१ ला इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३६ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी २९.५५ च्या सरासरीने १४९ विकेट्स घेतल्या. यात त्यांनी १२ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
४. सचिन तेंडूलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वोत्तम फलंदाज म्हणून तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेच पण त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही त्याचे महत्त्वाचे योगदान दिले आहे.
त्याने त्याच्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ वनडे आणि १ टी२० सामना असे मिळून ६६४ सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत. यामध्ये त्याने ४६.५३ च्या सरासरीने २०१ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने २ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने दोन्ही वेळा वनडेत ५ विकेट्स घेतल्या आहेत.
३. रवी शास्त्री – मुंबईचे माजी कर्णधार आणि भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्रींनी फेब्रुवारी १९८१ ला न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
त्यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही भरीव कामगिरी केली आहे. शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत ८० कसोटी आणि १५० कसोटी सामने असे मिळून एकूण २३० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ३८.६९ च्या सरासरीने २८० विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्यांनी ३ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
२. अजित आगरकर – मुंबईचा असणाऱ्या अजित अगरकरने एप्रिल १९९८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्यानंतर २६ कसोटी, १९१ वनडे सामने आणि ४ टी२० सामने खेळले. त्याचा २००७ च्या पहिल्या टी२० विश्वविजेत्या भारतीय संघातही समावेश होता.
त्याने एकूण २२१ सामने खेळताना ३१.०९ च्या सरासरीने ३४९ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी ३ वेळा केली.
१. झहिर खान – श्रीरामपूरमध्ये जन्मलेल्या झहिर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. २०११ च्या विश्वचषकातही तो भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
त्याने ऑक्टोबर २००० ला केनिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्यानंतर ९२ कसोटी, २०० वनडे आणि १७ टी२० सामने असे मिळून ३०९ सामने खेळले.
डावकरी वेगवान गोलंदाज असणाऱ्या झहिरने ३०९ सामन्यात ३१.१४ च्या सरासरीने ६१० विकेट्स घेतल्या. तसेच त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याची १२ वेळा कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११, कर्णधाराचं नाव खूप खास