महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, प्रभादेवी यांच्या सौजन्याने राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेला १० फेब्रुवारीला सुरुवात झाली. यजमान मुंबई शहर सह ठाणे, रायगड विजयी सलामी दिली तर सांगली व मुंबई उपनगर संघानी बादफेरीत प्रवेश केला.
कै जनार्दन राणे क्रीडा नगरी, प्रभादेवी येथे सुरू झालेल्या राज्यस्तरीय निमंत्रित जिल्हे कबड्डी स्पर्धेत अ गटात ठाणे विरुद्ध नंदुरबार यांच्यात कडवी झुंज झाली. मध्यंतराला १३-१२ अशी अवघ्या १ गुणांची आघाडी नंदुरबार कडे होती. सूरज दुदंले, चैतन्य माळी व सोनू थले याच्या खेळाच्या जोरावर ठाणे संघाने २७-२६ अशी बाजी मारली. नंदुरबार कडून दादासो आव्हाड, शिवराज जाधव यांनी चांगला खेळ केला, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्याना अपयश आले.
ब गटात यजमान मुंबई शहरने ५३-३५ असा एकतर्फी अहमदनगर संघावर विजय मिळवला. सुशांत साहिल व अजिंक्य कापरे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर मुंबई शहरला विजय सोपा झाला. क गटात रायगड विरुद्ध पुणे अशी लढत झाली. रायगड संघाने ४०-३३ असा विजय मिळवला. रायगड कडून स्मितील पाटील व गौरव पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.
ड गटात मुंबई उपनगर संघाने नाशिक वर ४७-२५ असा पहिला विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यांत सांगली संघावर२८-२१ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर सांगलीने ४५-२८ असा नाशिकवर विजय मिळवत ड गटातून उपविजयी होईन बादफेरीत प्रवेश निश्चित केला.