भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉने 2018 साली आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द धमाकेदार रित्या सुरू केली होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावले. पण यानंतर पृथ्वीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला तसेच तो दुखापतीमुळे देखील बराच त्रस्त झाला होता. इतकेच नाही तर, 2019 मध्ये पृथ्वीवर बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप होता आणि त्यामुळे तो 8 महिने क्रिकेटपासून दूर होता. यासर्व घटनांबद्दल पृथ्वी शॉने भाष्य केले आहे.
पृथ्वीने नुकत्याच क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण कालावधीविषयी माहिती दिली आहे. पृथ्वी शॉ म्हणाला, ‘न्यूझीलंड दौर्यापर्यंत सर्व काही ठीक आहे, असे मला वाटायचे. आयपीएलमध्येही मी चांगली कामगिरी केली. मी खरोखरच 2018-19 ऑस्ट्रेलिया मालिकेची वाट पाहत होतो. पण मला अचानक घोट्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले. फिजिओ आणि संघाच्या मॅनेजमेंटने तिसर्या कसोटीसाठी मला सज्ज ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. पण काही कालावधीनंतर माझ्या दुखापतीत सुधारणा होणे थांबले. तेव्हा मला प्रचंड दुःख झाले होते. परंतु या प्रकारच्या गोष्टी घडतच राहतात, असे इतर खेळाडू आणि संघाच्या प्रशिक्षकांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.’
पृथ्वीने आपल्यावर लागलेल्या बंदीबद्दलही माहिती दिली आहे. पृथ्वी शॉ म्हणाला, ‘मी दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार सुरु केले आणि आयपीएल खेळलो. पण त्यानंतर तो सिरपचा वाद समोर आला. मला वाटते की यासाठी माझे बाबा व मी जबाबदार आहे. मला आठवतंय की आम्ही इंदोरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होतो आणि त्यावेळी मला सर्दी आणि खोकला होता. एकदा मी रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेलो होतो आणि मला खूप खोकला येत होता. याबद्दल मी माझ्या वडिलांशी बोललो. त्यांनी मला बाजारात उपलब्ध असलेला कफ सिरप वापरण्यास सांगितले. पण फिजिओचा सल्ला न घेतल्याने माझी चूक झाली व डोपिंग टेस्टमध्ये मी दोष आढळलो.”
पृथ्वीने स्पष्ट केले की, हा त्याच्या जीवनातील फार कठीण काळ होता व त्याने या काळात धैर्य दाखवत मैदानावर पुनरागमन केले.
महत्त्वाच्या बातम्या –
अजबच! शोएब मलिकने चौकार तर आडवला, पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाज धावले ५ धावा, पाहा गमतीशीर व्हिडिओ
आशिया कप पुन्हा झाला स्थगित, आता ‘या’ साली होणार स्पर्धा
या ५ भारतीय क्रिकेटपटूंनी केले आहे चित्रपटांमध्ये काम; एका विश्वचषकविजेत्या कर्णधाराचाही समावेश