20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान रणजी ट्रॉफीच्या 2019-20 हंगामातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. या फेरीनंतर आता उपांत्य फेरीसाठी अंतिम 4 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये गुजरात, सौराष्ट्र, बंगाल आणि कर्नाटक या चार संघांचा समावेश आहे.
या 4 संघांनी उपांत्यपूर्व फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने जम्मू आणि काश्मिर संघाला 167 धावांनी पराभूत केले, तर गुजरातने गोव्याच्या संघाला 464 धावांनी पराभूत केले. तसेच बंगालने ओडीसा विरुद्ध तर सौराष्ट्रने आंध्र प्रदेश विरुद्ध अनिर्णित ठरलेल्या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेतली असल्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आता उपांत्य फेरीचे सामने 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान गुजराज विरुद्ध सौराष्ट् संघात आणि बंगाल विरुद्ध कर्नाटक संघात होणार आहेत.
असे झाले उपांत्यपूर्व फेरीचे सामने –
गुजरात विरुद्ध गोवा –
गुजरातने विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गोव्याला तब्बल 464 धावांनी पराभूत केले. गुजरातने या सामन्यात पहिला डाव 8 बाद 602 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर गोव्याला पहिल्या डावात सर्वबाद 173 धावाच करता आल्या.
यानंतर गुजरातने दुसरा डाव 6 बाद 199 धावांवर घोषित केला. त्यामुळे गोव्यासमोर विजयासाठी 629 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना सर्वबाद 164 धावाच करता आल्या.
बंगाल विरुद्ध ओडीशा –
अनिर्णित राहिलेल्या या सामन्यात बंगालने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 332 धावा केल्या होत्या. तर नंतर बंगालने ओडीशाला पहिल्या डावात 250 धावांवर रोखले आणि पहिल्या डावात 82 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बंगालने 373 धावा केल्या आणि ओडीशाला विजयासाठी 456 धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा ओडीसा पाठलाग करत असताना सामन्याच्या शेवटच्या दिवशी 10 षटकात 39 धावांवर असताना अंधूक प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. त्यामुळे अखेर सामना अनिर्णित राहिल्याने बंगालच्या संघाने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कर्नाटक विरुद्ध जम्मू आणि काश्मिर –
शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कृष्णप्पा गॉथमने दुसऱ्या डावात केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटकने जम्मू आणि काश्मिरचा 167 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.
या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 206 धावा केल्या होत्या. यानंतर जम्मू आणि काश्मिरला पहिल्या डावात 192 धावाच करता आल्या. त्यामुळे कर्नाटकने 14 धावांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर कर्नाटकने दुसऱ्या डावात 316 धावा करत पहिल्या डावातील 14 धावांच्या आघाडीसह 331 धावांचे आव्हान जम्मू आणि काश्मिरला दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना जम्मू आणि काश्मिरला 163 धावाच करता आल्या. या डावात कर्नाटककडून गॉथमने 18.4 षटके गोलंदाजी करताना 54 धावा देत 7 विकेट्स घेतल्या.
सौराष्ट्र विरुद्ध आंध्रप्रदेश –
हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात 419 धावा केल्या होत्या. तर आंध्रप्रदेशला पहिल्या डावात केवळ 136 धावांवर सर्वबाद करण्यात सौराष्ट्रने यश मिळवले. त्यामुळे त्यांनी 283 धावांची भक्कम आघाडी घेतली.
तसेच त्यानंतरही सौराष्ट्रने दुसऱ्या डावात 426 धावा केल्या आणि आंध्रप्रदेशला 710 धावांचे आव्हान दिले. यावेळी आंध्रप्रदेश या आव्हानाचा पाठलाग करत असताना 35 व्या षटकात 4 बाद 149 धावांवर असताना सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सौराष्ट्रने पहिल्या डावातील आघाडीमुळे उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले.
असे होणार आहेत उपांत्य फेरीचे सामने –
29 फेब्रुवारी – 4 मार्च 2020 –
गुजरात विरुद्ध सौराष्ट्र – सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, सौराष्ट्र (वेळ – सकाळी -9.30 वाजता)
बंगाल विरुद्ध कर्नाटक – इडन गार्डन, कोलकाता, (वेळ – सकाळी -9.30 वाजता)
विराट कोहलीचे टीकाकारांना चोख उत्तर !
वाचा????https://t.co/6fQ8b2QHB6????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020
आजच्याच दिवशी क्रिकेटच्या डाॅनने घेतला होता अखेरचा श्वास
वाचा????https://t.co/pRDeSb7NRK????#म #मराठी #Cricket #DonBradman— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020