काही दिवसांपूर्वीच भारताचे माजी अष्टपैलू रवी शास्त्री यांचा राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. यानंतर शास्त्री हे समालोचन किंवा जगप्रसिद्ध टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रशिक्षक बनू शकतात अशी चर्चा आहे. आता स्वत: शास्त्री यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण सध्या क्रिकेटपासून सुट्टी घेणार असून त्यानंतर यासंबंधी विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना रवी शास्त्री यांनी आपल्या भविष्यातील योजनांवर भाष्य केले आहे. क्रिकेट हा खेळ हळूहळू विकसित होतो आहे. त्यामुळे समालोचन आणि आयपीएल फ्रँचायझीचा प्रशिक्षक याखेरीज शास्त्रींनी मीडिया आणि डिजिटल स्पेसचा भाग बनण्यातही रस दाखवला आहे.
शास्त्री म्हणाले की, “पुढील पाऊल उचलण्यासाठी अजून खूप वेळ बाकी आहे. मी आता क्रिकेटमधून ब्रेक घेऊ इच्छित आहे आणि इतर खेळाशी संबंधित गोष्टी करु इच्छित आहे, ज्या मी करू शकतो. क्रिकेट हा खूप मोठा खेळ आहे आणि हळूहळू त्याचा विस्तार होतो आहे. मीडिया आणि डिजिटल स्पेसही वाढतो आहे. त्यामुळे सद्यस्थितीत माझी बोटे ५ वेगवेगळ्या दिशांना वळत आहेत.”
“तरी मी निश्चितपणे प्रशिक्षण क्षेत्रातच उतरेल. मी तळागाळात राहून काम करेन, यात कसलीच शंका नाही. कोणास ठाऊक मला आयपीएलमध्ये प्रशिक्षण करण्याची संधी मिळेल. जर ही संधी स्वतहून माझ्याकडे चालत आली, तर मी तिला नकार देणार नाही. याबरोबरच मला टिव्हीतही काम करण्याची संधी असेल. पण त्यापूर्वी मला थोडी विश्रांती हवी आहे,” असेही ते म्हणाले.
संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ सह रवी शास्त्री यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्यानंतर आता राहुल द्रविड यांच्याहाती भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे देण्यात आली आहेत. राष्ट्रीय संघावरील जबाबदारी संपल्यानंतर शास्त्री आयपीएल २०२२ मधील नवी फ्रँचायझी, अहमदाबाद संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. अशात येत्या काळात या चर्चा खऱ्या ठरतात की केवळ अफवा बनून राहतात, हे पाहवे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका
लेकाची काळजी! शोएब मलिकची मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे टी२० मालिकेतून तडकाफडकी माघार