आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये बुधवारी (३ नोव्हेंबर) दुसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ अखेर आपल्या चांगल्या लयीत दिसला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत अवघ्या २ गडी गमावून २१० धावा केल्या. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतक साजरे केले. रोहित शर्माने ७४ धावा करत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ४७ चेंडूत ७४ धावा केल्या. टी२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने सात वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची कामगिरी केली आहे. या यादीत त्याने महेला जयवर्धनेसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले आहे.
टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा पराक्रम विराट कोहलीने केला आहे. त्याने १० वेळा अशी कामगिरी केली आहे. ख्रिस गेलने नऊ वेळा टी२० विश्वचषक स्पर्धेत ५० धावांचा आकडा गाठला आहे. तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आहे. त्याने सात वेळा टी२० विश्वचषक स्पर्धेत ५० हून अधिक धावा झळकावल्या आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी रोहित शर्मा (७४) आणि केएल राहुल (६९) यांनी सलामी भागीदारी रचत १४० धावांची तुफानी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर अखेरीस हार्दिक पंड्या (नाबाद ३५) आणि रिषभ पंत (नाबाद २७) यांनी अवघ्या २१ चेंडूत ६३ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला २१० धावसंख्येपर्यंत नेले. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि करीम जनात यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्यानंतर २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २० षटकात ७ बाद १४४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ६६ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतने अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले ३ षटकार अन् धोनीला ‘या’ विक्रमात टाकले मागे
रोहित-राहुल जोडीची कमाल! तब्बल १४० धावांच्या भागीदारीसह मोठा विक्रम केला नावावर
भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार सांगणाऱ्या ब्रेट लीने घेतला यू-टर्न, आता ‘या’ दोन संघांचे घेतले नाव