टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान सुपर-१२ साखळी सामन्यात संपुष्टात आले. या स्पर्धेआधीच विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तो वनडे संघाचे कर्णधारपद देखील सोडू शकतो असे म्हटले जात आहे. विराटने टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा करून बराच कालावधी उलटला असला तरी, क्रिकेट वर्तुळात आजी- माजी खेळाडू याबाबत विविध प्रतिक्रिया देत आहेत. यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडावे आणि केवळ एक खेळाडू म्हणून खेळावे, असे त्याने म्हटले आहे.
शाहीद आफ्रिदीने विराट कोहलीला केवळ टी-२० मध्येच नाही, तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये संघाचे कर्णधारपद सोडावे, असा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीवरील संवादादरम्यान तो म्हणाला, ‘माझ्या मते, विराट कोहलीने केवळ एक खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय घ्यावा. यामुळे त्याच्यावरील दबाव कमी होईल. तो आता खूप क्रिकेट खेळला आहे. क्रिकेट संघाचे कर्णधारपद सांभाळणे हे काही सोपे काम नाही. विशेषत: भारत आणि पाकिस्तानमध्ये या बाबतीत अजून दबाव वाढतो. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली क्रिकेट आणि त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ शकतो.’
विराट कोहलीने टी२० प्रकारामध्ये संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीने टी२० विश्वचषकापूर्वीच या स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर रोहित शर्माला भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. संघाचा नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. केएल राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून खूप यश मिळवले आहे. त्याला एवढीच खंत असेल की, त्याने आतापर्यंत एकही आयसीसी जेतेपद जिंकले नाही.