बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत दिलेल्या मुलाखतींमुळे ते खूप चर्चेत होते. त्यानंतर विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून ज्या प्रकारे पायउतार झाला, त्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सौरव गांगुलीचे असे मतभेद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कर्णधार असतानाही असेच काहीसे घडले होते आणि नंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलेले. त्यानंतरही बराच गदारोळ झालेला. आता बीसीसीआयचे माजी महाव्यवस्थापक आणि भारतीय संघचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी (Ratnakar Shetty) यांनी सौरव गांगुलीबाबत नवे गुपित उघडले आहे. हे रहस्य २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी२० विश्वचषकाशी संबंधित आहे. (Sourav Ganguly Wants To Play In T20 World Cup)
रत्नाकर शेट्टी यांनी त्यांच्या ‘ ऑन बोर्ड: माय इयर्स इन बीसीसीआय ‘ या पुस्तकात लिहिले आहे की, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये २००७ च्या टी२० विश्वचषकात खेळण्याच्या किंवा न खेळण्याच्या मुद्द्यावर एकमत नव्हते. पुस्तकानुसार, ‘निवड समितीच्या बैठकीच्या एक दिवस आधी मला राहुलचा फोन आला. तो म्हणाला की, मी सचिन आणि सौरवशी बोललो. दोघांनीही मान्य केले की टी२० हा तरुणांचा खेळ आहे. त्यानुसार, मी निवडकर्त्यांना सांगितले की ते तिघेही आयसीसी टी२० विश्वचषकासाठी अनुपलब्ध आहेत. दिलीप वेंगसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० संभाव्य खेळाडूंची निवड केली. या यादीमध्ये त्या तिघांचे नाव नव्हते. त्यानंतर, दिलीप वेंगसरकर यांनी मला सांगितले की, त्यांना सौरवचा फोन आला होता. तो म्हणाला की, मी निवडीसाठी उपलब्ध असून, त्यांना दिलेली माहिती चुकीची आहे.’
धोनीने केले नेतृत्व
पहिल्या टी२० विश्वचषकात भारताचे चार वरिष्ठ खेळाडू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि झहीर खान खेळले नव्हते. वरिष्ठ खेळाडूंनी टी२० विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला असून, युवा खेळाडूंना संधी द्यावी, असे सांगण्यात आलेले. या कारणामुळे एमएस धोनीला कर्णधार बनवण्यात आले. पुढे धोनीच्या नेतृत्वात संघाने हा पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता. आता रत्नाकर शेट्टी यांच्या पुस्तकातून हा नवा खुलासा झाला आहे. येत्या काळात या प्रकरणी नवीन माहिती येऊ शकते किंवा सौरव गांगुलीची प्रतिक्रियाही पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-