विसावे शतक संपायला आले होते आणि भारतीय क्रिकेटमध्ये अचानक भूकंप झाला. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनसह अजय जडेजा, अजय शर्मा हे खेळाडू मॅच फिक्सिंगसारख्या क्रिकेटला कलंकित करणार्या घटनेत सहभागी असल्याचे समोर आले. काही खेळाडूंची क्रिकेट कारकीर्द तेथेच संपली; तर भारताच्या अनेक मोठ्या खेळाडूंकडे देखील संशयाने पाहिले जाऊ लागले. एकूणच भारतीय क्रिकेटचे दिवस फिरले होते. बीसीसीआयने अझरुद्दीनच्या जागी सौरव गांगुलीला कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. गांगुलीच्या नेतृत्वात पहिली मोठी स्पर्धा खेळायला म्हणून भारत, केनियाला रवाना झाला. आयसीसी नॉक-आउट ट्रॉफी म्हणजेच आत्ताची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती.
भारताचा संघ नेहमीप्रमाणेच संभाव्य विजेता म्हणून स्पर्धेत सहभागी झाला. अनुभवी खेळाडूंच्या जोडीला काही तरुण देखील संघात होते. भारताचा सलामीचा सामना नैरोबीच्या मैदानावर यजमान केनिया विरुद्ध होता. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केनियाच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही व केनियाचा डाव २०८ धावांवर मर्यादित ठेवला. भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व केले होते, पदार्पण करणाऱ्या २२ वर्षाच्या मराठमोळ्या झहीर खानने. आपल्या दहा षटकात त्याने ४८ धावा देत ३ गडी माघारी धाडले होते. कोवळ्या झहीरचे घातक यॉर्कर पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली होती. झहीरच्या येण्यामुळे भारताचा संघ वेगवान गोलंदाजीच्या आघाडीवर एक पाऊल पुढे जाणार होता, हे सर्वांना समजले होते.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या झहीरचे कुटुंब चांगले सुशिक्षित होते. वडिलांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता तर आई शिक्षिका. श्रीरामपूरमध्ये प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, झहीर उत्तम वेगवान गोलंदाज आहे हे लक्षात आल्यावर त्याचे वडिल त्याला मुंबईला घेऊन आले. मुंबईतील नॅशनल क्रिकेट क्लब संघासाठी त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तो मुंबई क्रिकेट वर्तुळात पुढे येत होता.
झहीरच्या एक दर्जेदार गोलंदाज होता, हे मुंबई इतकेच पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व ग्रामीण भागाला चांगले माहित होते. कारण, झहीरने आपल्या किशोरवयात अनेक ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. आजही पुणे आणि नगर जिल्ह्यातील लोक आवर्जून सांगतात की, आम्ही झहीरला टेनिस बॉलने गोलंदाजी करताना पाहिले आहे.
झहीरच्या कामगिरीचा आलेख चढत असताना, त्याची निवड मुंबईच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात झाली. पुढे, चेन्नईत ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज गोलंदाज डेनिस लिली यांनी एमआरएफ पेस फाउंडेशनची स्थापना केली आणि झहीरला त्या अकादमीत प्रवेश मिळाला. त्याचवेळी त्याने आपले प्रशिक्षक सुधीर नाईक यांच्या सांगण्यावरून, इंजीनियरिंग सोडून पूर्णवेळ क्रिकेटपटू होण्याचे ठरवले.
मुंबई क्रिकेट वर्तुळात त्याच्या तोडीचे वेगवान गोलंदाज नव्हते; तरी काही कारणांनी झहीरची मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड होत नव्हती. आयुष्यभर क्रिकेटच खेळायचे आहे असा निश्चय केलेल्या झहीरने शेवटी, बडोदा रणजी संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. संपूर्ण हंगामात त्याने ८ सामन्यात ३५ बळी मिळवत बडोद्याला रणजीचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. रणजीतील देखण्या कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड होण्यास जराही विलंब लागला नाही. २००० ला झालेल्या आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीमध्ये केनियाविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याच सामन्यातून भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह व यष्टीरक्षक विजय दहिया यांनीही पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात तीन बळी मिळवलेल्या झहीरने, पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ऍडम गिलख्रिस्ट आणि स्टिव्ह वॉ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दादा फलंदाज त्याच्या बळींच्या यादीत समाविष्ट झाले होते. त्याच वर्षी त्याने कसोटी पदार्पणही केले. गांगुलीच्या ‘न्यू इंडिया टीम’ चा प्रमुख गोलंदाज म्हणून झहीर खान तयार होत होता.
गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघ भल्याभल्या संघांना मात देत होता अशातच, २००३ विश्वचषकाचे बिगुल वाजले. एकापेक्षा एक फलंदाज व फिरकीपटू असलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाजीची धुरा जवागल श्रीनाथ, आशिष नेहरा व झहीर खान ही ‘त्रयी’ सांभाळणार होती. सगळ्या संघांना मात देत, भारताने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. तोपर्यंत स्पर्धेत झहीरच्या नावे १० सामन्यात १८ बळी होते. अंतिम सामन्यात झहीरने पहिला चेंडू नोबॉल टाकला आणि अपशकून झाला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत अंतिम सामन्यात ३५९ धावांचा डोंगर उभा केला. आतापर्यंत स्पर्धा गाजवलेल्या झहीरच्या अवघ्या ७ षटकात ६७ धावा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चोपल्या होत्या. वीस वर्षानंतर विश्वचषक उंचावण्याचे भारताचे स्वप्न त्यावेळी धुळीस मिळाले.
जवागल श्रीनाथ निवृत्त झाल्यानंतर, सर्वार्थाने झहीर भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज झाला. कारण, त्याचा समवयस्क असलेला आशिष नेहरा दुखापतीमुळे बेजार होता. त्याचवेळी इरफान पठाण, श्रीसंत यासारखे युवा वेगवान गोलंदाज भारतीय संघात दाखल झाले होते. जगातील सर्वच खेळपट्ट्यांवर झहीर आपल्या गोलंदाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकत असताना, त्यालादेखील दुखापतींनी जखडले. त्याची कामगिरी ढासळली, बीसीसीआयने वार्षिक करारात त्याला कमी रकमेच्या गटात सामील केले. इरफान, श्रीसंत यांच्यासोबतच आरपी सिंह, मुनाफ पटेल हे खेळाडू त्याला सरस जाऊ लागले.
दुखापतीतून सावरल्यानंतर, झहीरने भारतीय संघात पुनरागमनासाठी एक धाडसी निर्णय घेतला. २००६ च्या काउंटी हंगामासाठी वॉर्सेस्टरशायरने त्याच्याशी करार केला. पहिल्याच सामन्यात त्याने १० बळी मिळवले, अशी कामगिरी करणारा तो वॉर्सेस्टरशायर क्लबच्या शंभर वर्षांच्या इतिहासातील पहिला खेळाडू होता. पाच महिन्याच्या हंगामात त्याने ७८ बळी आपल्या नावे केले. त्याच वर्षी, ज्या मुंबई क्रिकेटकडून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, त्या मुंबईसाठी तो रणजी ट्रॉफी खेळू लागला. लवकरच त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले.
पुनरागमन केलेला झहीर यावेळी वेगळा भासत होता. पहिल्याच द. आफ्रिका दौऱ्यात त्याने २९ बळी आपल्या नावे केल्या. २००७ ला इंग्लंड मध्ये जिंकलेल्या कसोटी मालिकेत त्याने तीन सामन्यात १८ बळी टिपले. याच मालिकेत, केविन पीटरसन व झहीर खान यांच्यातील जेलीबीन प्रकरण चांगलेच गाजले होते. झहीर फलंदाजी करत असताना, पीटरसन खेळपट्टीवर जेलीबीन टाकत असल्याने झहीर रागावला होता. याच रागातून त्याने गोलंदाजीला आल्यावर, इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत, इंग्लंडच्या खेळाडूंना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. एकदा ब्रेट लीने देखील त्याच्याशी वाद घातल्यानंतर, झहीरने त्याला पुढच्या चेंडूवर षटकार ठोकत आपल्या बॅटची धार दाखवलेली. अगदी कारकीर्दीच्या सुरुवातीला हेन्री ओलोंगाला सलग चार षटकार ठोकत त्याने सर्वांनाच अचंबित केले होते.
२००३ साली विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्याचे अधुरे स्वप्न झहीरने २०११ मध्ये पूर्ण केले. यावेळी देखील तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज राहिला. मात्र, आठ वर्षापूर्वीची चूक त्याने यावेळी केली नाही. त्याची पहिली तीन षटके निर्धाव होती. शाहिद आफ्रिदी सोबत तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. २०११ विश्वचषकानंतर त्याच्या कारकिर्दीला घरघर लागली. इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो नव्याने यशस्वी पुनरागमन करू शकला नाही. नाही म्हणायला, काही मोजके कसोटी सामने तसेच २०१२ चा टी२० विश्वचषक त्याने खेळला. सततच्या दुखापती व भारतीय संघात नव्याने दाखल झालेल्या तरूण वेगवान गोलंदाजांमुळे त्याला संघात जागा बनवण्यात अडचण येत होती. यादरम्यान तो आयपीएलमध्ये खेळत होता. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे कर्णधारपद देखील त्याने दोन वर्ष भूषवले. अखेरीस, २०१५ ला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून त्याने निवृत्ती जाहीर केली.
झहीरने आपल्या १६ वर्षाच्या कारकिर्दीत भारतासाठी ९२ कसोटी व २०० वनडे खेळताना अनुक्रमे ३११ आणि २८२ बळी मिळविले आहेत. कपिल देव यांच्यानंतर निर्विवादपणे झहीर भारताचा सर्वात उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे.
झहीरच्या गोलंदाजीविषयी बोलताना भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनी म्हणतो, “झहीर खान भारताचा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम गोलंदाज होता. आपण सचिन तेंडुलकरला जो मानसन्मान देतो, तोच मानसन्मान झहीरला देखील मिळायला हवा. झहीर माझ्यासाठी गोलंदाजीतील सचिन आहे. त्याच्या योगदानाशिवाय, आम्ही जे मिळवले ते मिळवू शकत नव्हतो.”
निवृत्तीनंतर, झहीरला भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवावे अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अजून हा योग जुळून आला नाही. क्रिकेटव्यतिरिक्त व्यवसाय म्हणून त्याने पुण्यात ‘झेडके’ नावाचे हॉटेल देखील खूप वर्षांपूर्वी सुरू केले होते. युवा खेळाडूंना दुखापती कमी व्हाव्यात यासाठी मार्गदर्शन करणारी, प्रोफिटनेस ही कंपनी देखील त्याने सुरू केली आहे. कमालीचा बुद्धिमान असलेल्या झहीरला भारतीय संघात ‘ज्ञानी बाबा’ म्हणून ओळखत. असं म्हणतात की, विराट कोहलीने अनुष्का शर्मा सोबतच्या आपल्या नात्याबद्दल सर्वप्रथम झहीरलाच सांगितले होते. झहीरची फीमेल फॉलोईंग देखील जबरदस्त होती. अनेकदा मैदानात तरुणी “आय लव यू झहीर” अशा प्रकारचे पोस्ट घेऊन येत. झहीरचे नाव आधी अभिनेत्री ईशा शर्वानी हिच्यासोबत जोडले गेले होते. मात्र, झहीरने २०१७ ला अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्यासोबत विवाह केला. झहीर सध्या मुंबई इंडियन्स संघाचा संचालक म्हणून काम पाहतो.
झहीरचा लयबद्ध रनअप, चेंडू टाकण्यापूर्वी मारलेली ती उडी आणि बळी मिळाल्यानंतर दोन्ही हाताने दिलेला फ्लाइंग किस याची नक्कल न केलेला एकही क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. जेव्हा केव्हा भारतीय क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा वेगवान गोलंदाज म्हणून एक जागा झहीरसाठी कायम आरक्षित असेल.
ट्रेंडिंग लेख-
तपश्चर्या आली फळाला! तब्बल १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुर्यकुमार यादवला भारतीय संघात मिळाले स्थान