कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीदरम्यान अनेक खेळाडू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले दिसत आहे. ते इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करतानाही दिसून आले आहेत. नुकतेच काल (१२ मे) सुरेश रैना आणि रोहित शर्मा या भारतीय फलंदाजांनीही इंस्टाग्रामवर अनेक विषयांवर गप्पा मारल्या.
या गप्पांदरम्यान रैनाने भारतीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला संघात परत येण्यासाठी तो मेहनत घेत आहे. रैनाने भारताकडून शेवटचा सामना जूलै २०१८ मध्ये खेळला आहे.
रोहितशी बोलताना २००५ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला रैना म्हणाला, ‘मी स्वत:मध्ये सुधारणा केली. गुडघा दुखापतीनंतर मी फिटनेसवर काम करत होतो आणि या प्रक्रियेत मी ‘यो-यो’ टेस्ट देखील उत्तीर्ण झालो. मी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. मोठ्या खेळाडूंनी नेहमीच कठीण काळात मला साथ दिली आहे. मला वाटते अजूनही माझ्यामध्ये क्रिकेट शिल्लक आहे.’
याबरोबरच भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहितनेही म्हटले की रैनाने भारतीय संघात असायला हवे. रोहित म्हणाला, ‘मला माहित आहे की इतके वर्षे खेळल्यानंतर संघातून बाहेर असणे कठीण आहे. आम्ही नेहमी बोलत असतो की रैनाला संघात परत घ्यायला हवे. पण संघनिवड आमच्या हातात नाही आणि आपण केवळ मेहनत करु शकतो.’
रैनाने आत्तापर्यंत १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७६८ धावा, वनडेत ५६१५ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १६०५ धावा केल्या आहेत. तसेच रैनाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये ७ शतके आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
लाॅकडाऊन दरम्यान भारताच्या महान खेळाडूचे निधन
भारतासाठी आनंदाची गोष्ट, २०२१मध्ये भारतात होणार विश्वचषकाचे आयोजन
एआर रेहमानच्या गाण्यावर थिरकला केपी, थेट रेहमाननेच केला व्हिडीओ शेअर