-प्रणाली कोद्रे
गुजरातच्या भारुच जिल्ह्यातील इखार गावात त्याचा 12 जूलै 1983 ला जन्म झाला. घरी गरिबी असल्याने त्याने लहानपण मजदूरीचे कामही केले. गावातील काही तरुण गरिबीतून बाहेर पडण्यासाठी अफ्रिकेतील एखाद्या कारखान्यात किंवा दुकानात काम करायचे. त्याचे काकाही झाम्बिया देशात स्थायिक होते. त्यामुळे त्याच्या वडीलांना वाटायचे त्यानेही तिकडे जाऊन स्थायिक व्हावे. त्यांनी त्याला तिकडे पाठवण्यासाठी व्हिसावगैरेची तयारीही करायला सुरुवात केली होती. पण काही कागदपत्रांमुळे त्याचे काम झाले नाही. त्यामुळे तो इथेच राहिला आणि भारताला एक चांगला वेगवान गोलंगाज मिळाला. तो गोलंदाज म्हणजे मुनाफ पटेल.
मुनाफ ज्या इखार गावात लहानाचा मोठा झाला, त्या गावातील लोक कापसाची शेती करतात. त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची. त्यामुळे 14-15 वर्षांचा असतानाच त्याने त्याच्या वडीलांना हातभार लावायला सुरुवात केली. तो शाळेनंतर टाईल्स फॅक्टरीमध्ये काम करायचा. 8 तासांचे त्याला 35 रुपये मिळायचे. असे असतानाही मुनाफने क्रिकेटची आवड जपली होती. घरी त्याच्या वडीलांचा त्याच्या क्रिकेट खेळण्याला विरोध होता. त्यांना वाटायचे त्यात त्याचे काही भविष्य नाही. पण त्याची आई त्याच्या वडीलांना त्याला खेळू दे म्हणून समजवायची. याबद्दल मुनाफ म्हणतो, यात त्याच्या वडीलांची काहीच चूक नाही. कारण त्यांना असेपण काही करियर असते वैगरे माहितच नव्हते.
मुनाफ लहानपणी स्लिपर घालून क्रिकेट खेळायचा. अनेकदा त्यामुळे त्याच्या पायांना जखमा व्हायच्या. पण त्याने क्रिकेट खेळणे सोडले नव्हते. त्याला या मजदूरीच्या आयुष्याचा कंटाळा आला होता. त्याला यापेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे त्याने क्रिकेटला गंभीरतेने घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्याने युरोपमध्ये राहणाऱ्या युसुफ भाई गावात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्याला 400 रुपयांचे शुज घेऊन दिले आणि बडोद्यातील एका क्रिकेट क्लबमध्येही प्रवेश मिळवून दिला. त्यांच्यामुळे त्याने आफ्रिकेला जाण्यापेक्षा क्रिकेटची निवड केली. तिथे तो क्रिकेटवर मेहनत घ्यायचा. त्याच्या वडीलांना वाटायचे त्याने क्रिकेट खेळण्यापेक्षा त्यांना हातभार लावावा. पण मुनाफ त्यांना समजवायचा. तो त्याच्या वडीलांच्या मित्रांनाही त्यांना समजवायला सांगायचा.
असेच मुनाफचे क्रिकेट सुरु असताना एकदा त्याच्यातील कौशल्य भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरेंनी हेरले. त्यानंतर त्यांनी 20 वर्षांच्या मुनाफला त्यांच्या अकादमीत भरती करुन घेतले. त्यावेळी त्यांनी मुनाफकडून फी देखील घेतली नव्हती. उलट त्यांनी त्याला ब्रँडेड शुज घेऊन दिले होते. तिथून किरण मोरेंनी त्याला चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्येही पाठवले. तिथे मुनाफच्या गोलंदाजीला डेनिस लीलींच्या मार्गदर्शनाखाली पैलू पडत गेले. मुनाफने तिथे 5-6 महिने सराव केला. त्यावेळीचा एक किस्सा असा की मुनाफ गुजरातच्या एका छोट्या गावात वाढला असल्याने इंग्रजी येण्याचा काही संबंधच नव्हता. त्यामुळे जेव्हा लीली त्याला काही सांगायचे तेव्हा तो इतरांच्या तोंडाकडे पहायचा कारण त्याला ते काय सांगत आहेत, हेच कळायचे नाही. त्याला असे गांगारलेले पाहुन लीली हसून कोणाला तरी भाषांतर करायला सांगायचे.
एका मुलाखतीत मुनाफने आणखी एक किस्सा सांगितला होता. तो असा की एका परदेशी खेळाडूला तो गोलंदाजी करत होता. त्यावेळी मुनाफने सातत्याने बाऊन्सर टाकले होते. ते चेंडू त्या फलंदाजांच्या खांद्याला, ग्लव्हजला, हेल्मेटला लागले होते. त्यामुळे तो फलंदाज चिडून त्याला काहीतरी बोलला. पण इंग्लिश समजत नसल्याने मुनाफला तो काय म्हणाला हेच कळाले नाही. पण त्याने पाहिले की तो फलंदाज चिडला आहे. त्यामुळे तो लगेचच तिथून बाजूला झाला आणि थेट स्विमिंगपूलमध्ये गेला. कारण मुनाफला वाटले होते की तो त्याची तक्रार सरांकडे करेल. ज्यामुळे त्याला अकादमीतून काढले जाईल.
मुनाफने चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये लीलींसह स्टिव्ह वॉला देखील प्रभावित केले होते. त्यामुळे तो भारतातील एक चांगला वेगवान गोलंदाज होणार असे सर्वांनाच वाटू लागले होते. त्याने प्रथम श्रेणीचे सामने खेळण्याआधीच त्याचे नाव मोठे होऊ लागले होते.
अनेक क्रिकेटपटू त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात राज्याच्या संघाकडून करतात. मुनाफ बाबत मात्र असे झाले नाही. त्याने लीली, वॉ सारख्या दिग्गजांना एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रभावित केले होते. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याची निवड थेट भारत अ संघात झाली. त्यामुळे त्याचे प्रथम श्रेणीतील आणि लीस्ट ए क्रिकेटमधील पदार्पण भारत अ संघाकडून 2003 मध्ये झाले. पुढे त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले. त्यामुळे मुनाफने सुरुवातीला मुंबई संघाकडून खेळायला सुरुवात केली.
2006 ला त्याला भारताच्या वरिष्ठ संघातही स्थान मिळाले. त्याने मोहालीमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात खेळताना त्याने पहिली विकेट केविन पीटरसनची घेतली. दुसरी विकेट त्याने अँड्र्यू फ्लिंटॉफची घेतली. त्याने पहिल्या डावात 72 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव 300 धावांवर संपला. भारताने नंतर 38 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर त्याने अनिल कुंबळेसह चांगली गोलंदाजी करताना केवळ 25 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. अशा मिळून त्याने त्या सामन्यात 97 धावांत 7 विकेट्स घेण्याची कामगिरी करत त्याचे नाणे खणखणीत वाजवले होते. पुढे त्याने त्यावर्षी वनडेतही पदार्पण केले. त्याची 2007 च्या विश्वचषकातही निवड झाली. पण त्या विश्वचषकात भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तेव्हा भारतातील वातावरण फार पेटले होते. सचिन, गांगुली, झहिर यांच्या घरावर दगडफेक वगैरे झाली होती. त्यावेळी सचिनने मुनाफला विचारले होते ‘तूझ्या घरी सर्वकाही ठिक आहे ना’ तेव्हा मुनाफने उत्तर दिले होते ‘माझ्या गावात साधारण 8000 लोक रहातात आणि ते सर्व माझे रक्षण करतात.’
मुनाफचे रहाणीमान साधे होते. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतरही तो शहरात स्थायिक झाला नाही. त्याने त्याचा हा साधेपणा आजही जपलेला आहे. त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीचाच एक किस्सा असा की सुनील गावसकरांनी मुनाफवर नीटनेटके कपडे न घातल्याबद्दल, व्यवस्थित शर्ट इन न केल्याबद्दल टिका केली होती. त्यावेळी मुनाफ एक गावाकडून आलेला साधा क्रिकेटपटू होता. त्यावेळी त्या टिकेनंतर त्यावेळीचा कर्णधार द्रविडने त्याला हा वाद वाढू नये म्हणून शर्टइन करायला सांगितले. पण सेहवाग, हरभजन आणि युवराज वैगरे खेळाडू त्याला म्हणाले, सोड ना आम्ही पण नाही करणार उद्यापासून शर्ट इन.
पदार्पणानंतर काही दिवसात मुनाफची गोलंदाजीतील गती कमी झाली. त्यामुळे तो एक राखीव वेगवान गोलंदाज म्हणून राहिला. 12 कसोटी सामने खेळल्यानंतर 2009 च्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर मुनाफला कसोटीत संधी मिळाली नाही. पण एव्हाना तो वनडे संघाचा नियमित सदस्य झाला होता. त्याने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला झालेल्या सामन्यात 48 चेंडूत 4 धावा हव्या असताना त्याने 43 वे षटक टाकत 2 विकेट्स घेतल्या आणि भारताला 1 धावेने विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याने 2011 च्या विश्वचषकात स्थान मिळवले. या विश्वचषकात त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने त्या विश्वचषकात 11 विकेट्स घेतल्या होत्या तो झहिर आणि युवीनंतर भारताकडून त्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता. त्याची कामगिरी सर्वांना प्रभावित करणारी होती. भारताचे त्यावेळीचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्सदेखील म्हणाले होते मुनाफ भारताच्या 2011 विश्वविजेत्या संघाचा पडद्यामागचा हिरो होता.
मुनाफ मैदानाबाहेर कितीही शांत वाटत असला तरी तो मैदानात प्रचंड आक्रमक व्हायचा. याचा फटका देखील त्याला अनेकदा बसला आहे. त्याला एकदा श्रीलंका विरुद्ध खेळत असताना पंचांनी फलंदाजाला पायचीतचा निर्णय बदलला म्हणून चूकीची कृती केल्याबद्दल सामनाशुल्काच्या 75 टक्के दंड त्याला झाला होता. त्याने इराणी ट्रॉफीमध्ये खेळताना विरेंद्र सेहवागलाही डिवचले होते. आयपीएलदरम्यान त्याचे आणि शेन वॉर्नमध्येही मदभेद झाल्याचे अनेकांनी ऐकले आहे. त्याचे अमित मिश्राबरोबरही आयपीएलदरम्यान वाद झाले. पण मैदानात जरी तो आक्रमक होत असला, तरी तो मैदानाबाहेर मात्र तितकाच शांत आणि साधेपणाने रहायचा.
असाच एक किस्सा त्याने एका मुलाखतीत सांगितला होता. त्याला वाटायचे पबमध्ये गेले की दारु प्यावीच लागते म्हणून तो तिथे जाणे टाळायचा. पण एकदा गंभीरने त्याला समजावले की तिथे गेले म्हणजे तूला दारु प्यावीच लागेल असे नाही. मीही पित नाही, पण मी जातो. त्यानंतर मुनाफच्या मनातील भिती दूर झाली होती.
विश्वचषकानंतर मात्र मुनाफला भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने जून 2011 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याला सातत्याने दुखापती होत राहिल्याने त्याने त्याची जागा गमावली होती. त्याने भारताकडून शेवटचा वनडे सामना कार्डीफ येथे इंग्लंडविरुद्ध 16 सप्टेंबर 2011 ला खेळला. पण असे असले तरी मुनाफला त्याच्या छोट्या कारकिर्दीतही 2007 आणि 2011 विश्वचषक संघाचा भाग होता आले होते. तसेच तो दोन आयपीएल विजेत्या संघाचाही भाग होता. 2008ला तो आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता आणि 2013ला तो आयपीएल विजेत्या मुंबई संघाचा भाग होता.
भारतीय संघातून बाहेर पडला तरी तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर महाराष्ट्र संघाकडूनही खेळला. नंतर तो बडोदा संघाकडून शेवटपर्यंत खेळला. अखेर मुनाफने नोव्हेंबर 2018 ला निवृत्ती घेतली. त्याने निवृत्ती घेताना सांगितले की आता मी भारताकडूनही खेळत नाही. मग उगीच देशांतर्गत क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूची जागा का अडवायची. तसेच त्याने प्रशिक्षण क्षेत्रातही येण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या तरी तो त्याच्या इखार गावातच रहातो. मुनाफची कारकिर्द लहान राहिली असली तरी त्याने तो जेवढा खेळला त्यात त्याने महत्त्वाचे योगदान दिले. मात्र भारतीय संघाने सातत्याने केलेल्या प्रगतीपुढे मुनाफ कुठेतरी दुर्लक्षितच राहिला.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण