केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघातील ३ सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी (१४ जानेवारी) संपली. न्यूलँड्स येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. असे असले तरी ही मालिका खेळाडूंमधील वादामुळे जास्त गाजली. त्यातही तिसऱ्या कसोटीदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या डीआरएस रिव्ह्यूनंतर तर ज्या नाट्यपूर्ण घटना घडल्या, त्याची चर्चा क्रिकेटविश्वात चांगलीच रंगली. पण, या घटनेबद्दल कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे समजत आहे.
नक्की काय झालेलं?
केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव सुरू असताना कर्णधार एल्गर फलंदाजी करत होता. त्यावेळी आर अश्विनच्या गोलंदाजीवर भारतीय संघाने त्याच्याविरुद्ध पायचीतचे अपील केले होते. त्यावेळी मैदानावरील पंच मारेस इरास्मस यांनीही एल्गरला बाद दिले होते. भारतीय खेळाडूंना खात्री होती की एल्गर बाद झाला आहे. पण, एल्गरने त्यावेळी डीआरएसची मागणी केली. (Dean Elgar DRS Controversy)
पण, डीआरएसमधील हॉक-आय तंत्रज्ञानानुसार चेंडू स्टंपला स्पर्श न करता वरून जात होता, त्यामुळे मैदानावरील पंच इरास्मस यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि एल्गरला जीवदान मिळाले. यावर भारतीय खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती.
विराटसह आर अश्विन आणि केएल राहुल यांनी स्टंपमाईकमधून मालिकेचे प्रसारणकर्ते सुपरस्पोर्टवर राग व्यक्त केला होता. विराटने म्हटले होते की, त्यांनी फक्त दुसऱ्या संघातील खेळाडूंवर पकडण्याचा प्रयत्न न करता, स्वतःच्या संघातील खेळाडूंकडे देखील लक्ष ठेवले पाहिजे, तर अश्विन सुपरस्पोर्ट थेट नाव घेत म्हटला होती की, सुपस्पोर्टने जिंकण्यासाठी दुसरी एखादी पद्धत शोधली पाहिजे. तसेच केएल राहुल म्हटलेला की, ११ खेळाडूंच्या विरोधात पूर्ण देश खेळत आहे.
भारतीय खेळाडूंच्या या वागणूकीवर क्रिकेटविश्वातून मोठी टीका झाली, तसेच अनेक क्रिकेटतज्ञांव्यतिरिक्त चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते.
पण, आता या प्रकरणात आयसीसीकडून तरी भारतीय संघाला दिलासा मिळाल्याचे समजत आहे. कारण, इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसी या प्रकरणात भारतीय संघाविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, असेही समजत आहे की, सामनाधिकाऱ्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनेबरोबर चर्चा केली असून आचारसंहितेबद्दल आठवण करुन दिली आहे. या चर्चेचा विराट देखील भाग होता.
विराटने केले डीआरएस नाट्याबद्दल भाष्य
केपटाऊन कसोटीत डीआरएसवरून घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींबद्दल सामन्यानंतर भाष्य केले. त्याने म्हटले की, ‘मला याबाबत काहीच बोलायचं नाहीये. आम्हाला माहीत आहे की, मैदानावर काय झालं आहे. परंतु मैदानात काय घडतंय हे बाहेरच्या लोकांना माहीत नसते. माझ्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर तिथे आम्ही ३ गडी बाद केले असते, तर तो सामना बदलून टाकणारा क्षण असू शकला असता. आम्ही त्यांच्यावर अतिरिक्त दबाव टाकण्यात अपयशी ठरलो. परिणामी आम्हाला हा सामना गमवावा लागला.’
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?
आता या कसोटी मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका या उभय संघात १९ जानेवारीपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे ‘यंगिस्तान’ आजपासून सुरू करणार १९ वर्षांखालील विश्वचषकातील अभियान, जाणून घ्या वेळापत्रक
‘संघाची निवड माझे काम नाही’, कर्णधार कोहलीचे पुजारा-रहाणेच्या भविष्याच्या प्रश्नावर चोख प्रत्युत्तर
जोकोविचमागची साडेसाती संपेना! ऑस्ट्रेलियन सरकारने मेलबर्नमधून घेतलं ताब्यात