भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघात महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ८ मार्च होत आहे. भारतीय महिला संघ पहिल्यांदाच महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे.
याआधी 2005 आणि 2017 मध्ये भारतीय महिला संघाला वनडे विश्वचषकांच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावे लागले आहेत. या पराभवांची सल खेळाडूंच्या मनात असेल हे नक्कीच!!!
2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धचा अंतिम सामना सेंच्यूरियन येथे झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत 50 षटकात 215/4 अशी धावसंख्या उभारली. यात प्रमुख वाटा कॅरेन रॉल्टनच्या नाबाद 107 धावांचा होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना भारताचा डाव 117 धावांमध्ये आटोपला. कॅरेन रॉल्टन सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
2017 मध्ये इंग्लंडविरूद्धचा अंतिम सामना लॉर्डस मैदानावर झाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारीत 50 षटकात 228 धावा केल्या आणि 7 विकेट गमावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 219 धावांवर संपला. भारताकडून पूनम राऊतची 85 धावांची झुंज अपयशी ठरली. इंग्लंडकडून आन्या श्रुबसोलने केवळ 46 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. आन्या श्रुबसोल सामनावीर ठरली. टॅमी ब्युमॉंटने मालिकावीर हा किताब पटकावला.