भारताने २०१२ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. तेव्हा भारताचा कर्णधार उन्मुक्त चंद होता. पण आता तोच अमेरिकेत क्रिकेट खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. चंद अमेरिकेत सुरू होणाऱ्या मायनर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर’ या संघाकडून खेळणार आहे. याबाबतचा करारही त्याने संघासोबत केलेला आहे.
दरम्यान, भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने शुक्रवारी (१३ ऑगस्ट) भारतातील क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. तो आता अमेरिकेतील मायनर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेच्या एका वेबसाईट नुसार उन्मुक्त चंदने अमेरिकेमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी सिलिकॉन व्हॅली स्ट्राईकर संघासोबत खूप काळासाठी करार केला आहे. त्याचबरोबर चंद क्रिकेट खेळण्यासोबतच, अमेरिकेतील येणाऱ्या नवीन पिढीला क्रिकेटविषयक मार्गदर्शन करण्याची भूमिका देखील साकारणार आहे.
याबाबत बोलताना चंद म्हणाला, “अमेरिकेत क्रिकेटच्या विकासासाठी काम करणार असल्याने त्याचबरोबर मेजर लीग क्रिकेट सुरू होणार असल्याने याचा मला आनंद होत आहे. त्याचबरोबर या आठवड्यात मला स्ट्रायकर संघाकडून मायनर लीग क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार असल्याने, मी खूश झालो आहे.”
मायनर लीग क्रिकेट स्पर्धेत अमेरिका शहरातील २७ संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा टी-२० प्रकारच्या स्वरूपात खेळण्यात येणार आहे. २०० पेक्षा जास्त सामने अमेरिकेच्या २६ ठिकाणी खेळवले जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत ४०० पेक्षाही जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यातच आता भारताच्या उन्मुक्त चंदने देखील यात सहभाग नोंदवला आहे.
दरम्यान, २८ वर्षीय चंदने ट्विट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यासोबतच त्यानी आपल्या आठवणीतील काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात त्याने लिहिले, “ज्याप्रमाणे मागील काही वर्षात काही गोष्टी घडल्या, यामुळे मी आतून खूप बेचैन होतो. त्यामुळे मी माझ्या काही अनमोल आठवणींसह बीसीसीआईचा निरोप घेतो. यासह जगभरातील चांगल्या संधींचा मी लाभ घेईल.”
चंदने २०१२ साली १९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. ज्यात भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवत ही स्पर्धा आपल्या नावे केली होती. तसेच उन्मुक्त चंदच्या १११ धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे त्याला, या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात आला होता.
पुढे तो म्हणाला, “क्रिकेट हा खेळ जगभरात खेळाला जातो. भलेही याचा अर्थ वेगळा असेल परंतु अंतिम ध्येय हे नेहमी क्रिकेट खेळण्याचे असू शकते.” त्याचबरोबर बीसीसीआयचे आभार मानत चंद म्हणाला, “बीसीसीआयचे मनापासून आभार अनेक शिबिर सत्रात मला खेळण्याची संधी दिली. वरिष्ठ स्पर्धा आणि इंडियन प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये मला माझे कौशल्य दाखविण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.”
“भारताच्या क्रिकेट प्रवासात असे अनेक क्षण होते, जे माझ्यासाठी खूप अनमोल होते. त्यातीलच एक म्हणजे भारतासाठी १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणे. एक कर्णधार म्हणून कोणतीही स्पर्धा जिंकणे हा खूप अविस्मरणीय क्षण असतो. ही स्पर्धा जिंकल्यानंतर आणि तमाम भारतीयांना आनंद झाला होता. मी या क्षणांना कधीच विसरू शकत नाही. त्याचबरोबर भारताकडून खेळताना भारतीय संघाचा एक भाग असणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती,” असेही तो म्हणाला.
त्याच्या १९ वर्षाखालील विश्वचषकातील प्रदर्शनानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपल म्हणाला होता. “उन्मुक्त चंदला भारतीय संघात निवडले गेले पाहिजे.” यानंतर चंदला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासोबत एका टीव्ही जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती.
परंतु, नंतर चंदने या काळात अशा काही गोष्टी केल्या ज्या भारताच्या अनेक माजी खेळाडूंना अजिबात आवडल्या नाही. त्यातीलच म्हणजे टीव्हीवरील एका टॉक शोमध्ये सहभाग घेण्यासाठी त्याने, भारतीय अ संघाच्या प्रशिक्षण शिबिरातून ब्रेक घेतला होता. त्यामुळे त्याला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी खूप फटकारले होते. त्याचबरोबर भारताचे माजी मुख्य निवड करते संदीप पाटील यांना २०१५ साली चंदला झिम्बाब्वे दौर्यावर पाठवायचे होते. परंतु काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही.
दिल्लीमध्ये जन्मलेला उन्मुक्त चंद दिल्ली संघाकडून खेळत होता. त्यानंतर त्याने उत्तराखंड संघाकडून खेळताना कर्णधारपद देखील भूषवले होते. तसेच भारत अ संघाकडून देखील त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. चंदने आतापर्यंत एकूण ६७ प्रथम श्रेणीचे सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने ३३७९ धावा केल्या होत्या. ज्यात ८ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या –
–इरफान पठाणची प्रशिक्षक होण्याची तयारी पूर्ण; राहुल द्रविडचे मार्गदर्शनाबद्दल मानले आभार
–विराटच्या शतकाच्या दुष्काळावरून सेहवागने घेतली मजा, केले ‘असे’ ट्विट
–जो रूट ऑन फायर! लॉर्ड्सवर शतक ठोकत ‘असा’ पराक्रम करणारा बनला जगातील सहावा कर्णधार