भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सोमवारी(7 जानेवारी) चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकत इतिहास घडवला आहे. हा भारताचा ऑस्ट्रेलियामधील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. या विजयानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी हा भारतीय संघ जरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सर्वोत्तम असला तरी फलंदाजीच्या क्षेत्रात अजून सर्वोत्तम संघ नसल्याचे म्हटले आहे.
चॅपेल ESPNCricinfo शी बोलताना म्हणाले, ‘मी भारताच्या पाहिलेल्या संघापैकी हा सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी असणारा आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षण असलेला संघ आहे. पण हा सर्वोत्तम फलंदाजी असणारा संघ नाही. मी या संघापेक्षा अधिक चांगले फलंदाजांचे मिश्रण असलेला भारताचा संघ पाहिला आहे.’
या कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी सर्वांनाच चांगल्या कामगिरीने प्रभावित केले आहे.
त्यामुळे चॅपेल यांनीही भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना म्हणाले की ‘मला वाटते की भारतीय गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर चांगला दबाव ठेवला होता. त्यांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपेक्षा चांगली स्विंग गोलंदाजी करता आली.’
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या 70 विकेट्सपैकी 50 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी मिळून 21.62 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी मिळून 30 पेक्षाही अधिकच्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–विजयाच्या आनंदात शास्त्री- कोहलींकडून घडली मोठी चूक