भारतीय क्रिकेट संघाला मिळालेला महान कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो, त्याने भारतीय क्रिकेट इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला आणि त्या अध्यायाची सुरवात झाली 2007 सालच्या टी20 विश्वचषकापासून. 2007 साली भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्यावाहिल्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला नेतृत्व करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पुढे जे घडले तो इतिहास सर्वांना माहित आहे. मात्र आता याबाबत माजी अष्टपैलू युवराज सिंगने एक खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.
साल 2007 टी20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच योगदान अविस्मरणीय आहे. याच विश्वचषकात त्याने 6 चेंडूत सलग 6 षटकार मारण्याचा कारनामा केला होता.
युवराजने नुकतेच 22 यार्न पोडकास्टमध्येसांगितले की, ‘2007 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खराब प्रदर्शनामुळे भारताला पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले, त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये उलथापालथ झाली होती आणि त्यांनंतर भारताचा 2 महिन्याचा इंग्लंड दौरा होता. त्यादरम्यान आम्हाला एक महिना आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे होते आणि त्यांनतर मग टी20 विश्वचषक खेळण्यासाठी जायचे होते. आम्ही एकूण 4 महिने घरापासून दूर राहणार होतो. त्याकारणामुळे अनेक वरीष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. कदाचित कोणी टी20 विश्वचषकाकडे गांभीर्याने बघितले नसावे.’
त्याने पुढे सांगितले की ‘त्यांनंतर मी या स्पर्धेसाठी नेतृत्व मिळवण्याची आशा बाळगून होतो, परंतु नंतर घोषणा झाली की, एमएस धोनी नवा कर्णधार असेल. त्यानंतर आम्ही ठरवले की कर्णधार कुणीही असो, आमचं कर्तव्य होत की कर्णधाराला पाठिंबा देऊन संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन करणे.’
भारतीय संघाला दोन्ही विश्वचषक म्हणजेच 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकण्यात युवराजने मोलाची भूमिका निभावली होती. या दोन्ही विश्वचषकावेळी एमएस धोनी भारताचा कर्णधार होता.
धोनीने 2007 टी20 विश्वचषकानंतर भारताच्या संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेतृत्व केले. तो पुढे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारही झाला. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच धोनीने 2013 साली कर्णधार म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आयसीसीच्या 3 मोठ्या स्पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार म्हणून विश्वविक्रम नोंदवला.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ऑलिंपिक २०३२ चे आयोजन होऊ शकते ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ शहरात; पुढील महिन्यात होणार घोषणा
हे माहित आहे का? साउथॅम्टनमध्ये कसोटी शतक करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय क्रिकेटपटू