दिनांक ७ ऑक्टोबर २०१२… वेस्टइंडीज क्रिकेटसाठी हा एक मोठा आणि ऐतिहासिक दिवस होता. साठ-सत्तरच्या दशकात क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेटला त्यानंतर मिळालेल्या खराब कामगिरीच्या अभिशापातून मुक्त होण्याचा दिवस होता. श्रीलंकेच्या कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर त्यांना हा उशाप मिळाला. निमित्त होते टी२० विश्वचषकाचे. तब्बल ३३ वर्षानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली होती. टी-२० या क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारातली ही ट्रॉफी असली, तरीही ती विश्वविजयाची होती आणि त्याचे मोल करता येऊ शकत नव्हते.
एकेकाळी क्रिकेट जगतावर बेलगाम सत्ता गाजवणाऱ्या वेस्टइंडीजला लागली उतरती कळा अन्…
सन १९७५ आणि १९७९ असे सलग दोन विश्वचषक जिंकून वेस्ट इंडीजने क्रिकेट जगतावर एकछत्री अंमल गाजवला होता. १९८३ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत देखील ते पोचले होते. मात्र, त्यावेळी भारताच्या जिगरबाज संघाने त्यांचा पाडाव केला होता. तिसरा विश्वचषक जरी मिळवता आला नाही. तरीही वेस्टइंडीज संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा कमी झाला नव्हता. अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग, असे आग ओकणारे वेगवान गोलंदाज होते. तसेच क्लाईव्ह लॉईड, अल्विन कालिचरण, विव रिचर्डस, सर गॅरी सोबर्स यांसारख्या दिग्गजांची परंपरा असलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेटला ९० च्या दशकात उतरती कळा लागली.
एक संघ म्हणून वेस्ट इंडीजची कामगिरी रसातळाला गेली. काही खेळाडूंनी वैयक्तिकरित्या क्रिकेट जगतावर मात्र आपला ठसा उमटवला. ब्रायन लारा हा जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांच्या यादीत सामील झाला. तर, कर्टली अंब्रोज व कर्टनी वॉल्श हे वेगवान गोलंदाज आपल्या पूर्व खेळाडूंच्या पावलावर पाऊल टाकून दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसले.
२००० नंतरही परिस्थिती जास्त काही बदलली नाही. खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी चांगली होती. मात्र, सांघिक कामगिरीवर प्रश्नचिन्ह कायम होते. फलंदाजीत लारा, चन्द्रपॉल, सरवान व गेल ही मंडळी चमकत होती. तर, ड्वेन ब्राव्हो अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय पटलावर पुढे येत होता. इयान ब्रॅडशॉ व कोरी कोलीमोर यांनी गोलंदाजी विभाग सांभाळला होता.
खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीने जगाचे लक्ष वेधून घेऊ लागला वेस्ट इंडीज संघ…
२००३ विश्वचषकानंतर पुढील विश्वचषक वेस्ट इंडीजमध्ये करण्याचे आयसीसीने ठरवले होते. त्यामुळे, वेस्ट इंडीजने तो विश्वचषक जिंकायच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली. त्यांना यात पहिले यश मिळाले ते २००४ च्या इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत. यजमान इंग्लंडला अटीतटीच्या सामन्यात हरवत त्यांनी विजेतेपद आपल्या नावे केला. दोन वर्षांनी झालेल्या, २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील ते उपविजेते राहिले. एकदिवसीय क्रिकेटचा एक तगडा संघ म्हणून वेस्ट इंडीज पुढे येत होता. २००७ चा मायदेशातील विश्वचषक मात्र त्यांच्यासाठी लाभकारक ठरला नाही. संघाला सर्वोच्च आठ फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. याच विश्वचषकानंतर सर्वकालीन महान फलंदाज ब्रायन लारा निवृत्ती घेतली.
२००७ नंतर पुन्हा वेस्ट इंडीज क्रिकेट लयाला जाऊ लागले. देशोदेशी टी२० क्रिकेटचे वारे वाहत होते. वेस्ट इंडीजचे खेळाडू खासकरून फलंदाज व अष्टपैलू खेळाडू हे आक्रमक असल्याने त्या खेळाडूंना क्रिकेटच्या या फटाफट प्रकारात मागणी वाढू लागली. याचा परिणाम असा झाला की, वेस्ट इंडीजचे खेळाडू देश सोडून पैशाच्या मागे धावू लागले. तुटपुंज्या रकमेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापेक्षा एक-दोन महिन्यांसाठी मिलीयनमध्ये पैसे घेऊन हे खेळाडू व्यवसायिक लीगला प्राधान्य देत. खेळाडू व क्रिकेट बोर्डाचा वाद चव्हाट्यावर येऊ लागला. याचा परिणाम असा झाला की, संघाची कामगिरी पूर्ण ढासळली. चार वर्षात झालेले तीन टी२० विश्र्वचषक आणि २०११ च्या भारतीय उपखंडात झालेल्या विश्वचषकात वेस्ट इंडिज उपांत्यपूर्व फेरी च्या पुढे जाऊ शकला नाही.
वेस्ट इंडीज संघात वाहू लागले नेतृत्व बदलाचे वारे…
याचवेळी, वेस्ट इंडीज बोर्डाने एक धाडसी निर्णय घेतला. एक साधारण अष्टपैलू व अननुभवी डॅरेन सॅमीच्या हाती तीनही प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोपवण्यात आले. २०१२ ला वादाच्या पार्श्वभूमीवरच सॅमी श्रीलंकेत आयोजित चौथ्या टी२० विश्वचषकासाठी आपला संघ घेऊन आला. त्याच्या आणि वेस्ट इंडिज क्रिकेटच्या बाजूने एकच गोष्ट होती ती म्हणजे संघातील सगळे वरिष्ठ खेळाडू या विश्वचषकासाठी उपलब्ध होते.
भारतात आयपीएल गाजवणारे ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स या अनुभवी खेळाडूंच्या जोडीला आंद्रे रसेल, सुनील नरीन, रवी रामपॉल, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजत असलेले तरुण होते. फिडेल एडवर्डस, दिनेश रामदीन, सॅम्युएल बद्री, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ हे गेली चार-पाच वर्ष वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करत असलेले अननुभवी खेळाडू देखील होते.
सुरूवातीलाच अपयश पचवल्यानंतर दुपटीने धावू लागला विजयरथ…
ऑस्ट्रेलिया व आयर्लंड यांच्यासोबत ब गटात समाविष्ट असलेल्या वेस्ट इंडिजला आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. १९१ धावा उभारल्यानंतर डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे १७ धावांनी पराभूत व्हावे लागले. आयर्लंड विरुद्धचा सामना देखील पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही आणि सरस धावगतीच्या जोरावर वेस्ट इंडीजने सुपर एट फेरीत प्रवेश केला. सुपर एटमध्ये त्यांना श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, इंग्लंड व न्युझीलंडला मात देत, आपल्या गटात दुसरे स्थान पटकावून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा सामना होता, ऑस्टेलियाविरूद्ध. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने ख्रिस गेलच्या ७५ व कायरन पोलार्डच्या आक्रमक ३८ धावांच्या जोरावर २०५ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव, वेस्ट इंडीजच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे १३१ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडीजने ७४ धावांनी विजय साजरा करत प्रथमच टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली.
अंतिम सामना ठरला कसोटीचा पण….
तब्बल २९ वर्षांनी कोणत्यातरी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. धावफलकावर चांगल्या धावा लावण्याच्या मनसुब्याने फार्मात असलेले ख्रिस गेल व जॉन्सन चार्ल्स मैदानात उतरले. पहिल्याच षटकात चार्ल्स खातेही न खोलता माघारी परतला. अनुभवी सलामीवीर ख्रिस गेल आपल्या शैलीच्या विपरीत १६ चेंडूत ३ धावा करून बाद झाला.
सलामीवीरांच्या अवसानघातकी खेळानंतर अनुभवी मार्लन सॅम्युअल्सने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. आधी ब्राव्होसोबत त्याने डावाला आकार दिला. अडखळत्या सुरुवातीनंतर, सॅम्युअल्सने सर्व श्रीलंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. श्रीलंकेचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला त्याने पाच उत्तुंग षटकार लगावले. ५६ चेंडूत ७८ धावांची ऐतिहासिक खेळी त्याने खेळली. त्यात तीन चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. अखेरीस कर्णधार सॅमीने १५ चेंडूत २६ धावा चोपत, संघाला १३७ अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
तब्बल ३३ वर्षांने जगजेतेपद आणि कॅरेबियन खेळाडूंचा ‘गंगनम डान्स’ …
अंतिम फेरीत पुन्हा एकदा, वेस्ट इंडीज गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत श्रीलंकेला १०१ धावांवर रोखले. फलंदाजीत कमाल करणाऱ्या सॅम्युअल्सने गोलंदाजीतही चार षटकात १५ धावा देऊन दोन गडी बाद केले. सुनील नरीन व कर्णधार सॅमी हे देखील प्रत्येकी दोन बळी मिळवण्यात यशस्वी ठरले. अंतिम फेरीचा मानकरी अर्थातच सॅम्युअल्स ठरला.
३३ वर्षानंतर वेस्ट इंडीज पुन्हा विश्वविजेते झाले होते. क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारात देखील त्यांनी जगज्जेतेपदाचा मान मिळवला होता. आनंदाच्या वेळी कायम ‘कॅलिप्सो डान्स’ करणारे कॅरेबियन खेळाडू यावेळी मात्र बेभान होऊन ‘गंगनम डान्स’ करत होते.