कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारल्यानंतर गोलंदाजांनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली. भारतीय संघाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ५ गडी बाद केले. दरम्यान, सामना झाल्यानंतर त्याने त्याला केवळ मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू म्हणणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना ३४५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. एक वेळेस असे वाटू लागले होते की, न्यूझीलंड संघ भारतीय संघावर आघाडी घेईल. परंतु, अक्षर पटेलने ५ गडी बाद करत न्यूझीलंड संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले.
सामना झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू म्हणणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देत म्हटले की, “मला नाही माहित मला कोण मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू म्हणतं. मी जेव्हा जेव्हा प्रथम श्रेणी क्रिकेट किंवा भारतीय अ संघासाठी खेळलो आहे, तेव्हा मी चांगलेच प्रदर्शन केले आहे. मी तर कधीच असा विचार केला नाही की, मी मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू आहे. हे सर्व मानसिकतेबद्दल आहे. मी कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत होतो, जेव्हा मला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत संधी मिळाली, तेव्हा मी चांगली कामगिरी केली. माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिल्याचे श्रेय मी संघाला देईन.”
अक्षर पटेलने न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात ६२ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. यामध्ये त्याने टॉम लेथम, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, हेनरी निकोलस आणि टीम साउदी यांचा समावेश आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात फलंदाजी करताना ३४५ धावा करण्यात यश आले होते. भारतीय संघाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली होती, तर शुबमन गिलनेे ५२ आणि रवींद्र जडेजाने ५० धावांची तुफानी खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
चर्चा आयपीएल मेगा ऑक्शनच्या! २०२२ हंगामासाठी पंजाब किंग्स ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
“तू चेंडूला जास्त स्पिन करतो”, आर अश्विनने मागितलेल्या सल्ल्यावर ‘बापू’चे मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ