क्रिकेटपटूंना घरात बसून आता जवळपास २ महिने झाले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्धची देशांतर्गत वनडे मालिका रद्द झाल्यापासून भारतीय संघ मैदानापासून दूर आहे. असे असले तरी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे खेळाडू आपापल्या घरीच फीटनेस आणि मानसिक आरोग्यावर काम करत आहेत.
आयसोलेशनमध्ये (वेगळे राहणे) क्रिकेटपटू पुनरागमनासाठी स्वत:वर मेहनत घेत आहेत. तसेच प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीदेखील सीनियर संघाला मैदानावर परतवण्यासाठी काम करत आहेत.
अशामध्ये बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटूंच्या मैदानावर पूर्णपणे पुनरागमनासाठी ४ टप्प्यांचा कार्यक्रम तयार केला आहे. हा कार्यक्रम आताही सुरु असून आणि लॉकडाऊन (Lockdown) संपेपर्यंत किंवा परिस्थिती पूर्वीसारखी होईपर्यंत चालू राहणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह या चार टप्प्यांच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवत आहे. या चार टप्प्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
पहिला टप्पा-
संपूर्ण लॉकडाऊनसाठी बीसीसीआयशी करार केलेल्या खेळाडूंना काही प्रश्न विचारले आहेत. जेणेकरून समजू शकेल की, लॉकडाऊनमध्ये खेळाडूंकडे कोणकोणत्या सुविधा होत्या आणि त्यानंतर त्या लक्षात घेऊन पुढे काम केले जाईल. जसे की, सध्या मोहम्मद शमी आपल्या फार्महाऊसवर आहे. जिथे खूप मोठे मोकळे मैदान आहे. तर भुवनेश्वर कुमार आपल्या फ्लॅटमध्ये आहे. तिथे तो आपल्या लहान जिममध्ये ट्रेनिंग करत आहे.
भारतीय संघाचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल आणि ट्रेनर निक बेव यांनाही इतर प्रशिक्षकांसह ऍपचा खास एक्सेस देण्यात आला आहे. यामार्फत ते खेळाडूंशी दररोज चर्चा करतात. काही प्रकरणांमध्ये तर त्यांना दर तासाला लक्ष द्यावे लागते. फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकदेखील संघाच्या इतर सदस्यांबरोबर आपले सेशन करतात. या सर्वांवर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) लक्ष ठेवत आहेत.
भारतीय संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (National Cricket Academy) कोचिंग स्टाफबरोबर संपर्क साधत आहेत. फिजिओथेरपिस्ट रोज व्हिडिओ कॉलमार्फत ऑनलाईन सेशन घेतात. तसेच याचा साप्ताहिक अहवाल तयार करण्यात येतो.
दुसरा टप्पा-
लॉकडाऊन प्रभाव कमी झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम बदलण्यात येईल. तसेच खेळाडूंना स्थानिक स्टेडिअममध्ये पाठविले जाईल आणि कौशल्यानुसार कार्यक्रम सुरु करण्यात येईल.
तिसरा टप्पा-
बीसीसीआयनुसार, ते क्रिकेटपटूंना खास केंद्रामध्ये आणण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात व्यस्त आहेत. जे काही आठवड्यांमध्ये अंतिम करण्यात येतील. एकदा परिस्थिती पूर्वीसारखी झाल्यानंतर कौशल्यावर आधारित कार्यक्रमातून जावे लागेल आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणेही शक्य होईल.
चौथा टप्पा-
क्रिकेट पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरु करण्यासाठी बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, मैदानावर येण्यासाठी खेळाडूंची फीटनेस आणि मानसिकता योग्य असणे गरजेचे आहे.
सर्वांप्रमाणे बीसीसीआयदेखील भारतीय संघासाठी घरातून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने अनुभवी खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी व्हिडिओवर आधारित ऍप्लिकेशन तयार केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११
-सर्वाधिक वेळा पार्टनरला धावबाद करत तंबूचा रस्ता धरायला लावणारे फलंदाज