नवी दिल्ली । भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. यादरम्यान संघात त्याच्या जागी काही नवीन गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही भुवनेश्वरची (Bhuvneshwar Kumar) जागा रिकामी आहे. त्यातच कसोटीमध्येही जलदगती गोलंदाजांमध्ये स्पर्धा पाहण्यास मिळत आहे. भारतीय संघात आता ५ जलदगती गोलंदाज आहेत. त्यामुळे भुवनेश्वरला संघात पुनरागमन करण्यास खूप अडचण येत आहे. हे स्वत: भुवनेश्वरने मान्य केलं आहे.
भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत भारतीय संघात मोहम्मद शमी (Mohammed Shami), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इशांत शर्मा (Ishant Sharma), उमेश यादव (Umesh Yadav) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) हे जलदगती गोलंदाज आहेत. पुनरागमनानंतर भुवनेश्वरची फीटनेस चाचणीही बाकी आहे. त्याचबरोबर त्याचे जुन्या लयीत येणंदेखील गरजेचं आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना भुवनेश्वर म्हणाला, “सर्व खेळाडूंप्रमाणे मीदेखील कसोटी क्रिकेट खेळू इच्छित आहे. पण मला ही गोष्ट मान्य करायला अडचण नाही, की कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे माझ्यासाठी सोपे नाही. कारण आजचे सर्व गोलंदाज चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे संघात खूप मोठी स्पर्धा आहे.”
२०१८ नंतर भुवनेश्वर कुमार कसोटी संघात आपली जागा बनवू शकला नाही. असे असले तरी त्याने आपल्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यात १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर जोहान्सबर्ग येथे खेळला होता. या सामन्यात दोन्ही डावात मिळून त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. याअगोदर केपटाऊन येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या होत्या.
केपटाऊन सामान्य अगोदर कोलकाता येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ८ विकेट्स घेऊन भारताला शानदार विजय मिळवून दिला होता.
कसोटी पुनरागमनाबद्दल भुवनेश्वर पुढे म्हणाला, “आता मी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. ज्यामुळे मी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल. माझ्यामते हा क्रिकेटमधील सर्वात कठीण प्रकार आहे. या प्रकारात चांगलं प्रदर्शन केल्यानंतर सर्वात जास्त समाधान मिळतं. मी आता दुखापतीतून पूर्णपणे बरा झालो आहे. मी आता विश्वचषकात निवडीचा विचार करत नाही. कारण आता सुरक्षित राहणे सर्वांसाठी गरजेचं आहे.”
भुवनेश्वरने आतापर्यंत २१ कसोटी सामन्यात ६३ बळी घेतले आहेत, तर ११४ वनडे सामन्यात १३२ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जगातील सर्वात मोठा अंपायरचं म्हणतोय, या ३ खेळाडूंची फलंदाजी माझी विशेष आवडती
-सौरव गांगुली बाद झाला रे झाला की ‘हा’ खेळाडू ढसाढसा रडायचा
-३ अशा घटना ज्यामध्ये दादाने दाखवून दिले होते की, तोच आहे खरा बॉस