भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे मागील काही महिन्यांपासून भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातून बाहेर आहे. पण तरीही त्याने पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना याबद्दल रहाणे म्हणाला, “मला विश्वास आहे की मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघात पुनरागमन करेल आणि मला विश्वास आहे की मी विश्वचषकतही खेळेल. म्हणूनच मी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे मला मदत मिळेल आणि मी खात्रीने पुनरागमन करेल.”
भारताच्या कसोटी संघाचा नियमीत सदस्य असलेला रहाणे पुढे म्हणाला, “कधीकधी अशी वेळ असते जेव्हा तूम्ही 20 किंवा 30 धावा केलेल्या असतात आणि तूम्हाला याची मोठी खेळी कराल असे वाटत असते. पण तूमचे मन भविष्यात जाते आणि मग गोष्टी बदलतात. त्यामुळे वर्तमानात असणे आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणे महत्त्वाचे असते.”
“जेव्हा चांगले काही होत नसते तेव्हा अनेक लोक तूम्हाला सहानभूती देण्यासाठी येतात. पण अशा लोकांपासून लांब रहाणे आणि नकारात्मक विचार न करणे गरजेचे असते.”
रहाणेने भारताकडून शेवटचा वनडे सामना यावर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याला भारताच्या वनडे संघात संधी मिळालेली नाही. मात्र तो भारताच्या कसोटी संघात नियमित खेळत असून त्याची कामगिरीही समाधानकारक आहे.
त्याने काही दिवसांपूर्वी विंडीज विरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. तसेच त्याआधी झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही त्याने कसोटी मालिकेत दोन अर्धशतके केली होती.
मात्र संघासाठी चांगली कामगिरी न केल्याने रहाणे निराश होता. याबद्दल तो म्हणाला, “जेव्हा तूम्ही संघासाठी चांगली कामगिरी करत नाही तेव्हा वाईट वाटते. जेव्हा मला दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते तेव्हा निराशा झाली होती.”
“पण मी माझे लक्ष केंद्रीत ठेवले आणि जोहान्सबर्ग कसोटीत मला संधी मिळाली. या सामन्यात मी 48 धावा केल्या. या धावा शतकाइतक्याच महत्त्वाच्या होत्या.” तो सामना भारताने 63 धावांनी जिंकला होता.
रहाणेने आत्तापर्यंत 90 वनडे सामने खेळले असून यात त्याने 35.26 च्या सरासरीने 2962 धावा केल्या. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.