मुंबई | भारतीय संघ ऑगस्टमध्ये तीन आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौऱ्यावर येत असल्याची माहिती आफ्रिका क्रिकेट बोर्डाने गुरुवारी जोहान्सबर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्डाकडून याबाबत खुलासा करण्यात आला असून आफ्रिका क्रिकेट बोर्डाला या दौऱ्याविषयी कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगितले आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल या दौऱ्याविषयी माहिती देताना म्हणाले की, भारताच्या आफ्रिका दौऱ्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. केवळ संभाव्य चर्चा झाली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ग्रीम स्मिथ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक पॉल यांनी भारताच्या आफ्रिका दौऱ्याविषयी माहिती दिली होती.
धूमल म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा मध्यंतरी रद्द करण्यात आला होता त्यानंतर क्रिकेट बोर्डाकडून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर येईल असे सांगण्यात आले होते. मात्र हा दौरा अद्यापही निश्चित झाला नाही. या दौऱ्याला जाण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. अंतिम मंजुरीनंतर हा दौरा सुरू होईल. दोन महिन्यांनंतर देशातील परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.