भारताच्या युवा प्रतिभावान खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ याच्या नावाचा समावेश होतो. तो भारतीय संघाकडूनही खेळला आहे. एकेकाळी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांच्या फलंदाजीचे मिश्रण म्हटला जाणारा फलंदाज पृथ्वी शॉ दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीनंतर पृथ्वी आता संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत खूपच मागे पडला आहे. मात्र, मुंबईच्या या युवा खेळाडूने शनिवारी (दि. 08 जुलै) मोठे भाष्य करत म्हटले की, तो राष्ट्रीय संघातील आपल्या जागी पुनरागमन करण्यासाठी आपल्या स्वाभाविक आक्रमक खेळावर विश्वास ठेवणे सुरू ठेवेल.
दुलीप ट्रॉफी 2023 (Duleep Trophy 2023) स्पर्धेत सेंट्रल झोन विरुद्ध वेस्ट झोन संघात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने मोठे भाष्य केले. यावेळी त्याने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याचे नाव घेत म्हटले की, “वैयक्तिकरीत्या मला माझ्या खेळात बदल करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. होय, मी माझ्या खेळात समंजस्यपणे सुधारणा करू शकतो. मी पुजारा सरांसारखी फलंदाजी करू शकत नाही किंवा पुजारा सर माझ्यासारखी फलंदाजी करू शकत नाहीत.”
वेस्ट झोनकडून खेळणाऱ्या या सलामीवाराने म्हटले की, “मी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांच्या मदतीने इथपर्यंत पोहोचलो आहे. उदाहरणार्थ माझी आक्रमक फलंदाजी. मी यामध्ये बदल करू इच्छित नाही.”
तो असेही म्हणाला की, त्याला कारकीर्दीच्या या टप्प्यात अधिकाधिक सामने खेळायचे आहेत. 23 वर्षी पृथ्वी म्हणाला की, भारतीय संघात पुनरागमनाच्या प्रयत्नासाठी त्याच्यासाठी प्रत्येक धाव महत्त्वाची असेल. तो म्हणाला की, “मला वाटते की, यावेळी मला ज्या सामन्यातही खेळण्याची संधी मिळत आहे, ते माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. मी दुलीप ट्रॉफीत खेळेल किंवा मुंबईसाठी सामना खेळेल, मला वाटते की, माझ्यासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करणे खूपच महत्त्वाचे आहे.”
पृथ्वी दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यातील दोन्ही डावात चांगली सुरुवात मोठ्या धावसंख्येत बदलण्यात अपयशी ठरला. त्याने 25 आणि 26 धावांची खेळी साकारली. तो म्हणाला की, “हे फलंदाजांसाठी आव्हानात्मक होते, पण त्याच्याकडे यातून मार्ग काढण्याची योजना होती. हे शक्य नाहीये की, तुम्ही नेहमीच सर्वोत्तम असाल. अशाप्रकारे गोष्टी झाल्यानंतर मी आणखी मेहनत करण्याचा प्रयत्न करतो. टी20त जास्त आक्रमक खेळ करणे आवश्यक असते. मात्र, मानसिकता अशीच असते.”
पृथ्वीबद्दल थोडक्यात
पृथ्वी शॉ याने भारतीय संघाकडून शेवटचा सामना जुलै 2021मध्ये खेळला होता. यावेळी तो श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथील आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात शेवटचा भारतीय निळ्या जर्सीत दिसला होता. याव्यतिरिक्त तो आयपीएल 2023 मध्येही छाप सोडण्यात अपयशी ठरला. त्याने यादरम्यान 8 सामन्यात 13.25च्या सरासरीने 106 धावा केल्या होत्या. यामध्ये फक्त 1 अर्धशतकाचा समावेश होता. (cricketer prithvi shaw statement on cheteshwar pujara goes viral)
महत्वाच्या बातम्या-
पहिल्यांदाच टीम इंडियात सामील झालेला शिलेदार चमकला! कर्णधाराला साथ देत चोपल्या ‘एवढ्या’ धावा
कॅरेच्या हेअरकटच्या पैशांवरून वातावरण तापले! धमकी अन् इंग्लिश मीडियाच्या बातमीनंतर स्मिथकडून पोलखोल