भारतातील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील आई वडिलांना वाटत असते की मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपले जीवन सुखकर रित्या जगावे. पालकांच्या या आग्रहाखातर काही मुले वेगवेगळ्या पदव्या घेतात मात्र त्यानंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात जात त्यातही यशस्वी होतात. अनेक भारतीय क्रिकेटर देखील याला अपवाद नाहीत. अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन सारखे काही क्रिकेटपटूंनी इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहेत. पण आज आपण या लेखात अशा क्रिकेटपटूची माहिती बघणार आहोत की ज्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वी थेट आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली होती.
भारताचा तो खेळाडू आहे अमय खुरासिया. अमय हे डावखुऱ्या हाताचे आक्रमक फलंदाज होते. संपूर्ण भारतीय क्रिकेट वर्तुळात त्यांची ओळख ही वेगाने धावा करणारा खेळाडू म्हणून होती. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल की आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वी अमय हे आयएएसची परीक्षा पास झाले होते. त्यांना इंडियन कस्टम्स व सेंट्रल एक्साइज विभागात इंस्पेक्टर हे पद मिळाले होते.
अमय यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1990 मध्ये खेळण्यास सुरुवात केली व 2006 पर्यंत ते मध्यप्रदेश संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होते. अमय यांनी मध्य प्रदेश साठी खेळलेल्या 119 प्रथम श्रेणी सामन्यात 40.80 च्या सरासरीने 7304 धावा केल्या आहेत. त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ही 238 धावा होती. प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये त्यांच्या नावावर 21 शतक आणि 31 अर्धशतके आहेत.
अमय यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भारताकडून 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 1999 साली 10 सामने खेळले होते. या सामन्यात त्यांनी 13.54 च्या सरासरीने केवळ 149 धावा केल्या. जेव्हा अमय यांनी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा त्यांनी हे ही कबूल केले की त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होता आले नाही. मात्र त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, जेव्हा ते उत्कृष्ट कामगिरी करत होते तेव्हा त्यांना सातत्याने संधी मिळत नव्हती.
अमय यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नसली तरी ते त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यासाठी सर्वांच्याच लक्षात राहतील. 1999 सालच्या पेप्सी चषकात श्रीलंकेविरुद्ध त्यांनी आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यांनी चौकारांसह डावाची सुरुवात केली होती. आपल्या पहिल्या सामन्यात त्यांनी 45 चेंडूत 57 धावांची आक्रमक खेळी केली होती. विशेष म्हणजे आपल्या कारकीर्दीतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणारे ते केवळ आठवे भारतीय खेळाडू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉकडे या गोष्टीची कमी, पाकिस्तानच्या क्रिकेटरने लक्षात आणून दिली शॉची मोठी चूक
पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा बिल्लो रानी गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ
आयपीएलनंतर पहिल्यांदाच समोर आला एमएस धोनीचा व्हिडीओ, पत्नी साक्षीने शेअर केला तो खास क्षण