मुंबई । भारताचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच हिच्याशी नुकतेच मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी गुपचुपपणे विवाह केल्याचे वृत्त आहे. याचसोबत तो लवकरच बाप माणूस होणार असल्याची आनंदाची बातमी आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे.
ऐन भरात असताना पंड्याला दुखापतीने घेरले. त्यामुळे बरेच दिवसांपासून तो क्रिकेटपासून दूर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो पुनरागमन करणार होता. पण आयपीएलच्या स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
दरम्यान, हार्दिकने त्याची कारकीर्द घडविण्यात रिकी पाँटिंगचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. यासोबत त्याने कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांचेही आभार मानले. कमालीच्या गुणवत्तेचा धनी असलेला हार्दिक 2015 साली पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या संघात आयपीएलमध्ये खेळताना दिसून आला.
हार्दिक एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला की, “पाँटिंग असे खेळाडू होते की, ज्यांनी माझी सर्वात जास्त काळजी घेतली. एका मुलाप्रमाणे मला सांभाळत होते. ते मला माझ्या पित्यासमान आहेत. क्रिकेटमधल्या अनेक बारीक सारीक गोष्टी सांगितल्या. मानसिक दृष्टया कसे मजबूत रहायचे यावरही त्यांनी काम केले.”
तो म्हणाला, “2015 साली मी एक नवखा खेळाडू होतो. होर्डिंग्जच्या बाजूला बसायचो. त्यावेळी पाँटिंग माझ्याजवळ बसायचे आणि खूप साऱ्या गप्पा मारायचे. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. पुढे राष्ट्रीय संघात खेळताना विराट, रोहित आणि रवी सरांनी मला स्वातंत्र्य दिले. त्यामुळे मी माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागलो. राहुल द्रविड यांनी एक क्रिकेटर म्हणून माझा खूप आदर केला. मी जसा आहे तसा मला त्यांनी स्वीकारलं.
बुमराहला एकटे राहायला आवडते
हार्दिक पंड्याने त्याचा सहकारी, अचूक यॉर्करने फलंदाजाची तारांबळ उडविणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या विषयी बोलताना म्हणाला की, “तो एकटे राहणे पसंद करतो. तो खूप शांत आहे. जस्सी एक वेगळ्या प्रकारचा माणूस आहे. त्याच्याकडे खूप सारी माहिती आहे. बोलण्यापूर्वी तो वीस वेळा त्या गोष्टीचा विचार करतो. तो असा खेळाडू आहे, की त्यासोबत मला राहायला आवडेल, असे पंड्याने नमूद केले.