मुंबई। बुधवारी (२७ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ( IPL 2021) बुधवारी (२७ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. हा सामना गुजरातने अखेरच्या चेंडूवर ५ विकेट्सने जिंकला. हा गुजरात टायटन्स संघाचा गेल्या ८ सामन्यांतील ७ वा विजय होता. यामुळे त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. या विजयानंतर हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरातने जिंकला रोमांचक सामना
बुधवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९५ धावा केल्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने ६५ धावांची आणि एडेन मार्करमने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातकडून वृद्धिमान साहाने ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच शुबमन गिलने २२ धावांची खेळी केली. पण गुजरातची मधली फळी स्वस्तात कोलमडली. मात्र, अखेरच्या षटकात राहुल तेवतिया आणि राशिद खानने तुफानी फटकेबाजी कामगिरी करताना विजय मिळवला.
अखेरच्या षटकात गुजरातला २२ धावांची गरज होती. यावेळी पहिल्या दोन चेंडूंवर राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) एका षटकारासह ७ धावा काढल्या. त्यानंतर राशिद खानने (Rashid Khan) अखेरच्या ४ चेंडूत ३ षटकार खेचत गुजरातला विजय मिळवून दिला. गुजरातने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या. हैदराबादकडून सर्व ५ विकेट्स उमरान मलिकने घेतल्या (Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad).
‘ईश्वर मदत करतोय’ – हार्दिक पंड्या
हार्दिक (Hardik Pandya) सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘मी ड्रेसिंग रुममध्ये मजेने म्हणतो की, ईश्वर तुम्हाला सांगतोय की, तुम्ही चांगले खेळाडू आहेत, मी तुम्हाला मदत करतो. हे इतके सातत्याने होत आहे की, मला भीती वाटते की प्लेऑफमध्ये आमचे भाग्य आमच्यापासून दूर जाईल की काय.’ गुजरातने आत्तापर्यंत ४ सामने अखेरच्या षटकात १० पेक्षा जास्त धावांची गरज असतानाही जिंकले आहेत.
हार्दिक पुढे म्हणाला, ‘आम्ही ड्रेसिंग रुममधील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वजण पुढे जात आहे. तसेच आम्ही हे देखील सुनिश्चित करत आहोत की खेळाडूंना योग्य पाठिंबा मिळेल.’ तसेच तो त्याच्या फिटनेसबद्दल म्हणाला, ‘माझी गोलंदाजीचे व्यवस्थापन योग्य करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेतले आहेत. अशी योजना आहे की, जेव्हा संघाला माझी गरज असेल, तेव्हा मी गोलंदाजी करेल. ही मोठी स्पर्धा आहे आणि मला सुरुवातीलाच उत्साहीत व्हायचे नाहीये.’
हार्दिक संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल म्हणाला, ‘आम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहोत. आम्ही अशा परिस्थितीत विजय मिळवण्याबाबत चर्चा केल्या आहेत. संघाच खूप आत्मविश्वास आहे. डगआऊट शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. बरेच श्रेय सपोर्ट स्टाफला जाते, ते खेळाडूंना चांगल्या प्रकारे सांभाळतात.’
गुजरातचा पुढचा सामना ३० एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मॅक्सवेलच्या लग्नाची पार्टी अन् आख्खा बेंगलोर संघ वऱ्हाडी! विराटनेही टीममेट्सबरोबर लावले ठुमके
राशिद खानचा दिसला ‘फिनिशर’ अंदाज! अखेरच्या षटकात ३ सिक्ससह केली धोनीची बरोबरी
‘गप्प बस वडा पाव, एक मॅच तर जिंकत नाही तुझ्याकडून’, चाहते का करतायेत रोहित शर्माला ट्रोल?