मुंबई । भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातला क्रमांक एकचा गोलंदाज आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने अनेक फलंदाजांची भंबेरी उडवून टाकणारा हा खेळाडू टीम इंडियाचा महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. आपल्या चार वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत तो भारतीय संघातील गोलंदाजीचे नेतृत्व करतोय. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघाकडून खेळत आहे.
दरम्यान, वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप यांच्या मते, “क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळणे जसप्रीत बुमराहचे करिअर संपवू शकते.”
“बुमराह भारतीय नियमित वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघाकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतो. आतापर्यंत त्याने शंभरपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा नियमित सदस्य आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो सतत खेळत राहिला तर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त वाढू शकणार नाही,” असे मत बिशप यांनी व्यक्त केले.
“बुमराह सारखे टॅलेंटेड खेळाडू सतत मिळत नाही. त्याचा नियोजनपूर्वक वापर करावा. जास्त क्रिकेट खेळल्याने त्याचे शरीर थकू शकते. परिणामी त्याची क्रिकेटमधील कारकीर्द लवकर संपवू शकते,” असे बिशप यांनी सांगितले.
बिशप यांनी भारतीय वेगवान गोलंदाजीचे कौतुक करताना म्हणाले की, ” कसोटी क्रिकेटमधील हा क्रमांक एकचा संघ आहे. भारतीय वेगवान गोलंदाजीचा ताफा पाहून एका नव्या युगाची सुरुवात झाली असल्याचे वाटते. जागतिक क्रिकेटमध्ये क्रमांक एकचा संघ व्हायचं असेल तर फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहू शकत नाही. कारण विदेशी दौऱ्यात वेगवान गोलंदाजाची गरज पडते आणि असे उपयुक्त गोलंदाज भारतीय संघाला मिळाले आहेत.”