अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात ५५ वा सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४२ धावांनी विजय मिळवला. पण असे असले तरी या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. हा सामना दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना होता. तसेच या हंगामातीलही अखेरचा सामना ठरला.
या सामन्यादरम्यान मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी होती. पण, हैदराबादचे आव्हान यापूर्वीच संपले होते. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी १७० पेक्षा अधिक धावांनी विजयाची गरज होती. पण, ही गोष्ट शक्य झाली नसल्याने मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद २३५ धावा केल्या आणि हैदराबादला २३६ धावांचे आव्हान दिले होते. त्यामुळे, जर मुंबईने हैदराबादला ६५ धावांवर सर्वबाद केले असले, तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला असता. पण हैदराबादने २० षटकात ८ बाद १९३ धावा केल्या आणि मुंबईने केवळ ४२ धावांनी सामना जिंकला. त्यामुळे मुंबईचे आयपीएल २०२१ मधील आव्हान संपले.
विशेष म्हणजे, हैदराबादच्या जेसन रॉय आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीनेच ६४ धावांची सलामी दिली. या दोघांनी ५.२ षटकात आक्रमक खेळ करताना सलामीला ६४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे, हैदराबादला ६५ धावांत सर्वबाद करण्याची मुंबईची आशा तिथेच जवळपास संपली आणि प्लेऑफमधील प्रवेशाचे स्वप्नही भंगले.
या सामन्यापूर्वी चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये चूरस होती. कारण कोलकाता साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर +०.५८७ रनरेटसह आणि १४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होते. तर मुंबईलाही हैदराबादला पराभूत करुन १४ गुण मिळवण्याची संधी होती. जी संधी मुंबईने साधली. मात्र, नेटरनरेटच्या बाबतीत मुंबई इंडियन्स कोलकाताच्या मागे राहिला. त्यामुळे कोलकाताने प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला.
हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर मुंबईचे +०.११६ नेटरनरेटसह १४ गुण झाले. त्यामुळे मुंबई गुणतालिकेत पाचव्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहिले. तसेच यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्लेऑफमधील स्थान पक्के केले होते.
असे होतील प्लेऑफचे सामने.
आता १० ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या गुणतालिकेतील अव्वल दोन संघात पहिला क्वालिफायर सामना पार पडेल. या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. तर, पराभूत होणाऱ्या संघाला आणखी संधी मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात ११ ऑक्टोबरला एलिमिनेटरचा सामना पार पडेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघाविरुद्ध १३ ऑक्टोबरला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळेल. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये १४ वर्षात कोणाला न जमलेली कामगिरी मोहम्मद नबीच्या नावावर
ईशान-रोहितच्या वादळात हैदराबाद भुईसपाट; सलीमी जोडीने नवा विक्रम केला प्रस्थापित
वॉर्नरने घेतला हैदराबादच्या चाहत्यांचा निरोप, लिहिला भावूक संदेश