आशियाई क्रिकेट संघासाठी १९८३ मध्ये एशियन क्रिकेट काऊंसिलची स्थापना झाली. त्यानंतर १९८४ पासून एशियन क्रिकेट काऊंसिलच्या अंतर्गत आशियाई संघांमध्ये आशिया चषक ही महत्त्वपूर्ण स्पर्धा सुरु झाली. ही स्पर्धा प्रत्येकी २ वर्षाने खेळण्याचे ठरले होते. पण पहिल्या १० वर्षात प्रत्येकवेळी काहीतरी समस्या उत्पन्न होत होती. कधी भारतीय संघ सहभागी होणार नव्हता, तर कधी पाकिस्तान. पहिल्या ४ आशिया चषक स्पर्धेत एकवेळा भारत स्पर्धेत सामील झाला नव्हता. तर एकवेळा पाकिस्तान सामील झाला नव्हता. १९९३ चा आशिया चषक तर भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे रद्द करण्यात आला होता.
यानंतर पाचवा आशिया चषक १९९५ ला संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाला. त्यापूर्वी झालल्या ४ आशिया चषक स्पर्धांपैकी भारत सहभागी झालेल्या तीनही स्पर्धा जिंकला होता. त्यामुळे १९९५ मध्येही भारताचा आशिया चषकातील विजयाची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न होता. पण यावेळी मात्र भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चारही संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धेतील रंगत वाढली होती. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आली. म्हणजेच प्रत्येक संघ एकमेकांबरोबर एक-एक सामना खेळणार. त्यातून अव्वल २ संघ अंतिम सामन्यात भिडणार होते.
त्यावेळी साखळी फेरीनंतर भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या तीन संघांनी प्रत्येकी २ विजय मिळवले होते, तर प्रत्येकी १ पराभव स्विकारला होता. भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध तर श्रीलंकेला भारताविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोणते २ संघ जाणार हा प्रश्न होता. परंतु नेटरनरेटच्या नुसार भारत पहिल्या आणि श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे हेच दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. तर पाकिस्तान आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडले.
असा झाला होता अंतिम सामना –
भारताने १९९५ पर्यंत कधीही आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारला नव्हता. आताही हा इतिहास कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न होता. तर श्रीलंकेला दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकण्याची आशा होती. त्यामानाने तेव्हा दोन्ही संघ तुल्यबळाने सारखे होते. अखेर १४ एप्रिल १९९५ ला अंतिम सामन्याचा दिवस आला. हा अंतिम सामना शारजामध्ये खेळला जाणार होता.
तसेच भारताने या स्पर्धेत जेव्हाही नाणेफेक जिंकली होती तेव्हा प्रथम गोलंदाजीच स्विकारली होती. यावेळीही अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार अझरुद्दीननने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी स्विकारली. त्यावेळी श्रीलंकेच्या संघात सनथ जयसुर्या, असंका गुरुसिन्हा, अरविंद डी सिल्वा आणि अर्जून रणतुंगा असे फलंदाज होते. त्यामुळे आता ही तगडी फलंदाजांची फळी किती धावा करु शकणार हा प्रश्न होता. सलामीला जयसुर्याबरोबर रोशन महानमा उतरला. त्या दोघांनी मिळून चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या 10 षटकात 46 धावा केल्या. पण 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनिल कुंबळेने महानमाला(15) त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुरुसिन्हा आला. त्याने मात्र चांगली फलंदाजी करण्यास सुरुवात केली. परंतु दुसऱ्या बाजूने श्रीलंकेच्या विकेट्स नियमित कालांतराने पडत राहिल्या. जयसुर्या(22), डी सिल्वा(13) आणि अर्जून रणतुंगा(3) असे फलंदाज एकामागून एक बाद झाले. तळातील हसन तिलकरत्ने (22), रोमेश कालूवितरना(18) हे देखील थोडाफार संघर्ष करुन बाद झाले. एकट्या गुरुसिन्हाने एकेरी झुंज देत 85 धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीमुळे श्रीलंकेला निदान 50 षटकात 230 धावा करता आल्या.
त्यानंतर आता 231 धावांचे आव्हान भारतासमोर होते. त्यावेळी भारताची फलंदाजी फळीदेखील चांगली होती. भारताकडून सलामी फलंदाजीला 22 वर्षीय युवा सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर उतरले. त्यांनी सुरुवात तर चांगली केली. पण 48 धावांच्या भागीदारीनंतर प्रभाकर वैयक्तिक 9 धावांवर असताना चामिंडा वासच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कालूवितरनाने त्याचा झेल घेतला.
त्याची विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नवज्योतसिंग सिद्धू उतरले. पण ते फलंदाजीला आल्यानंतर लगेचच 10 धावा जोड्यावर सचिन 41 धावांवर असताना चंपका रामनायकेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल बाऊंड्री जवळ जयसुर्याने घेतला. त्यामुळे आता अधिच अंतिम सामना त्यात 58 धावांवरच भारताने 2 विकेट्स गमावल्याचा दबाव होता.
त्यावेळी भारताला जवळपास 38 षटकात 173 धावांची गरज होती. तेव्हा सगळी जबाबदारी सिद्धू आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या कर्णधार अझरुद्दीनवर आली. त्यांनीही ही जबाबदारी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर समर्थपणे सांभाळली. त्यांची जोडी खेळपट्टीवर जमल्यावर त्यांनी कोणत्याच श्रीलंकेच्या गोलंदाजांना वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्यांनी प्रत्येक गोलंदाजांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. प्रत्येक गोलंदाजाने त्यावेळी 5 च्या वर इकोनॉमी रेटने धावा दिल्या. केवळ मुथय्या मुरलीधरनचा इकोनॉमी रेट 5 च्या खाली होता. तर जयसुर्या आणि रामनायकेने तर 6 च्यापेक्षाही अधिक इकोनॉमी रेटने धावा दिल्या होत्या.
अझहर तर जसे काही हा सामना जिंकूनच जायचे असे ठरवून आला होता. सिद्धू आणि अझरने बघता बघता 42 षटकांच्या आतच 233 धावा करत भारताला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला आणि आशिया चषकावर भारताचे नाव कोरले. त्यादिवशी त्यांनी पहिल्या 2 विकेट्सनंतर एकही विकेट भारताची जाऊ दिली नाही. त्यांनी नाबाद 175 धावांची भागीदारी रचली होती. त्या डावात अझरुद्दीनने 89 चेंडूत नाबाद 90 धावा केल्या. यावेळी त्याने 5 चौकार आणि 2 षटकारही मारले, त्याला उत्तम साथ सिद्धूने देताना 5 चौकारांसह 106 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या.
अझरुद्दीनला अंतिम सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तर सिद्धूला संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केल्याबद्दल मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने त्या स्पर्धेत 98.50 च्या सरासरीने 197 धावा केल्या होत्या. भारताने त्यावेळी आशिया चषकातील अंतिम सामन्यात अपराजित राहण्याचा इतिहास कायम राखला होता. भारताने चौथ्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले होते. 1995 च्या त्या आशिया चषकात सर्वाधिक धावा सचिनने केल्या होत्या. त्याने 205 धावा केल्या होत्या. तर सर्वाधिक विकेट्स कुंबळेने घेतले होते. त्याने एकूण 7 विकेट्स या स्पर्धेत घेतल्या होत्या.
पुढे आशिया चषकात 1997, 2004 आणि 2008 मध्ये श्रीलंकेने भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद मिळवले. तर भारताने 2010 ला पुन्हा एकदा श्रीलंकेला पराभूत करत 1995 नंतर पहिल्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले. नंतर 2016 आणि 2018 ला भारताने बांगलादेशला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद मिळवले. आत्तापर्यंत एकूण 7 वेळा भारताने, 5 वेळा श्रीलंकाने आणि 2 वेळा पाकिस्तानने आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे.
वाचनीय लेख –
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
एका छोट्याश्या खिळ्याने घेतला होता प्रतिभावान क्रिकेटपटूचा जीव
१६व्या वर्षी कसोटी पदार्पण करत जबरदस्त करियर केलेले ३ क्रिकेटर