भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक यशाची शिखरे गाठली. त्याने केवळ मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येच नाही तर कसोटीमध्येही भारतासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा कसोटीमध्ये क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटीत अनेक अविस्मरणीय विजय देखील मिळवले. यात धोनीने त्याच्या यष्टीरक्षण आणि फलंदाजीतून महत्त्वाचे योगदानही दिले. पण धोनीचा कसोटी क्रिकेटमधील प्रवास कसा सुरु झाला? याबद्दल फारसे कोणाला माहित नाही. आज आपण त्याबद्दलच जाणून घेऊ.
धोनीचे कसोटी पदार्पण
डिसेंबर २००४ ला धोनीचे वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. त्यानंतर पदार्पणाच्या पहिल्या वर्षातच धोनीने शानदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. त्याच्या वनडेमधील कामगिरीमुळे त्याला जवळपास १ वर्षाने कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याची भारतात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. ही कसोटी मालिका सन २००५ मध्ये डिसेंबर महिन्यात होणार होती.
या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर २ ते ६ डिसेंबरदरम्यान होणार होता. या सामन्यातून धोनीचं कसोटी पदार्पण होणार होतं. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेशही होता. मात्र सामन्याच्या पहिल्या दिवशी चेन्नईत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पुढेच्या दोन्ही दिवशीही ओल्या मैदानामुळे खेळ झाला नाही. त्यामुळे या सामन्याच्या पहिल्या तीनही दिवशी एखादं षटक सोडा पण साधी नाणेफकही होऊ शकली नाही.
अखेर सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच ५ डिसेंबर २००५ ला दुपारी २.३० वाजता नाणेफेक झाली. भारताचा तत्कालिन कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. याबरोबरच धोनीचे अखेर जवळपास साडेतीन दिवसांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर कसोटीत पदार्पण झाले. तेव्हा धोनी भारताकडून कसोटी पदार्पण करणारा २५१ वा खेळाडू ठरला होता.
कसोटी पदार्पणातील धोनीची कामगिरी
धोनीनेही कसोटी पदार्पणात त्याची छाप सोडली. त्याने ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५४ चेंडूत ३० धावांची खेळी केली. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात ३० धावांचा आकडा गाठणारा विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडनंतरचा तो केवळ तिसरा खेळाडू होता. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावा करता आल्या नव्हत्या. भारताने या डावात ७३.२ षटकात सर्वबाद १६७ धावा केल्या.
नंतर श्रीलंकेने पाचव्या दिवसाखेर पहिल्या डावात ४३ षटकात ४ बाद १६८ धावा केल्या. यातील ३ विकेट्स अनिल कुंबळेने घेतल्या होत्या. तर १ विकेट इरफान पठाणने घेतली होती. तसेच धोनीने या सामन्यात यष्टीरक्षण करताना पठाणच्या गोलंदाजीवर अविष्का गुणवर्धनेचा झेल घेतला होता.
धोनीची कसोटी कारकिर्द –
१५ वर्षांपूर्वी कसोटी कारकिर्दीला सुरुवात केलेल्या धोनीने एकूण ९० कसोटी सामने खेळले. त्यात त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यात त्याच्या ६ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटीत द्विशतकही केले. विशेष म्हणजे चेन्नईच्याच स्टेडियममध्ये धोनीने २२४ धावांची द्विशतकी खेळी केली होती. ही खेळी त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सन २०१३ ला केली.
धोनीने त्याच्या कारकिर्दीतील ९० कसोटी सामन्यांपैकी ६० सामन्यात भारताचे नेतृत्वही केले.
सन २०१४ ला घेतली निवृत्ती –
२०१४-१५ ला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांनंतर धोनीने कसोटीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २६ ते ३० डिसेंबर २०१४ ला झालेला भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना धोनीच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् अशी सुरु झाली शिखर धवनची लव्हस्टोरी
“जर नटराजनने बुमराहसारखीच कामगीरी केली, तर…”, सेहवागने दोघांबद्दल सांगितला अजब योगायोग
ट्रेंडिंग लेख –
HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी
मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी