रवी शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा प्रशिक्षकपदाचा करार संपला आहे आणि त्यांच्या जागी संघाला राहुल द्रविड यांच्या रूपात नवीन प्रशिक्षक मिळाले आहेत. शास्त्रींच्या संघासोबतच्या कार्यकाळात भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले. यादरम्यान संघाला एकाही आयसीसी स्पर्धेचे जेतेपद जिंकता आले नाही. त्यांच्या कार्यकाळात संघाने २०२१ टी२० विश्वचषकात निराशाजनक प्रदर्शन केले. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनात संघाने २०१६ टी२० विश्वचषकाचा उपांत्य सामना, २०१९ विश्वचषकाचा उपांत्य सामना आणि २०२१ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. मात्र, यापैकी एकदाही संघाला विजय मिळाला नाही. शास्त्रींनी आता याविषयी खंत व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत बोलताना शास्त्री म्हणाले की, “मी म्हणेल की, हा संघ माझ्या कार्यकाळात दोन आयसीसी जेतेपद जिंकण्याचा हकदार होता. मी ही गोष्ट प्रत्येक वेळी बोलून दाखवेल. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा निर्णय एका सामन्याने होणे हे मला नेहमी वाटते की, हे योग्य नाहीय. कारण संघ पाच वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर होता. माझ्यासाठी ही सर्वात मोठी निराशा होती. कारण आम्ही आयसीसी ट्रॉफी मिळवण्यासाठी सामन्याला अनिर्णित देखील नाही केले. २०१९ विश्वचषकात मला वाटले की, जेव्हा खेळ राखीव दिवसात गेला तेव्हा सकाळचे १० मिनिट सोडले तर आम्ही चांगले क्रिकेट खेळले, खेळ पुढच्या दिवशी गेल्यामुळे वातावरण बदलले.”
शास्त्रींच्या कार्यकाळात भारतीय संघाने एकही आयसीसी जेतेपद जिंकले नसले तरी, संघाने जवळपास इतर सर्व संघांसोबत मालिका खेळल्या आहेत आणि जिंकल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असा दौरा म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने दोन कसोटी मालिका जिंकल्या होत्या. तसेच यावर्षी पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यातही भारत कसोटी मालिका जिंकण्याच्या मार्गावर होता, पण ही मालिका अर्ध्यात रद्द करण्यात आली.
शास्त्री पुढे म्हणाले की, “आम्ही एकदिवसीय आणि टी२० मध्ये सर्व संघांचा त्यांच्या मायदेशात पराभूत केले. जेव्हा सर्व प्रकारांमध्ये तुम्ही ७० टक्क्यांपेक्षा जास्त सामने जिंकले असतील, तेव्हा तुम्ही जास्त काही बोलू शकत नाही. जर माझ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला कोणी म्हटलं असतं की, सात वर्षांनंतर असा रेकॉर्ड राहील, तर मी धन्यवाद म्हटलो असतो. कारण केवळ एकाच संघाचा असा रेकॉर्ड असू शकतो आणि तो आहे ऑल ब्लॅक (न्यूझीलंड रग्बी संघ). त्यामुळे लोभ असणे एक गोष्ट आहे आणि अती लोभी असणे असणे वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे होय, कोणतेच आयसीसी जेतेपद न जिंकणे निराशा करते आणि २०१९ विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना नेहमीच आमच्यासाठी सर्वात चांगली संधी होती.”