भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत संस्मरणीय मालिका विजयाची नोंद केली. या मालिकेत भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने आपली आक्रमक फलंदाजीने या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. ब्रिस्बेन कसोटीतील शानदार खेळीने तर तो भारताच्या मालिका विजयाचा खऱ्या अर्थाने नायक ठरला.
मात्र भूतकाळातील भारताच्या एका पराभवाचे शल्य पंतला अजूनही टोचत असलायचे त्याने नुकतेच उघड केले. २०१९ सालच्या इंग्लंड येथील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला विजय मिळवून न देऊ शकल्याची खंत यावेळी पंतने बोलून दाखवली. बोरिया मजुमदार यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले.
“विश्वचषकाची संधी होती सगळ्यात मोठी”
आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना यावेळी रिषभ पंत म्हणाला, “२०१९च्या विश्वचषकापासून आत्तापर्यंतचा प्रवास बराच चांगला होता. या प्रवासात बरेच चढ-उतार आले. यात २०१९चा विश्वचषक ही सगळ्यात मोठी संधी होती, कारण विश्वचषक दर चार वर्षांनंतर येत असतो. मात्र या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात मी ३०च्या आसपासच्या धावसंख्येवर बाद झालो. त्यावर मी अतिशय निराश होतो, कारण मी मोठी संधी गमावली होती.” पंतने या सामन्यात ३२ धावा केल्या होत्या. मात्र हा सामना न्यूझीलंडने १९ धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
तो पुढे म्हणाला, “भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवू न शकल्याने मी नाखुश होतो. माझी कारकीर्द या विश्वचषकानंतर हळूहळू पुन्हा बहरायला लागली. मी देखील माझ्या खेळाकडे अधिक गंभीरपणे लक्ष देऊन चुका सुधारण्यावर भर दिला. यात मला जाणवले की सुधारणा करण्यासाठी कोणत्याच मर्यादा नसतात. तुम्ही सतत तुमच्या खेळात नवनवीन सुधारणा करू शकता. माझ्या मते तुम्ही जेव्हा चांगली कामगिरी करता तेव्हा तुम्हीच स्वतःला योग्य दिशेने घेऊन जाता. आणि त्यावेळी तुमचे लक्ष योग्य गोष्टींवर केंद्रित होते,”
दरम्यान, रिषभ पंतबाबत बोलायचे झाल्यास तो सुरुवातीला भारताच्या विश्वचषकातील संघाचा भाग नव्हता. मात्र त्यानंतर शिखर धवनला दुखापत झाल्याने त्याला संधी मिळाली. मात्र या संधीचा तो फारसा लाभ उठवू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या:
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तारखेत बदल, जाणून घ्या नवे वेळापत्रक
हॅपी बर्थडे मिस्टर डिपेंडेबल! चेतेश्वर पुजारावर आजी-माजी खेळाडूंनी केला शुभेच्छांचा वर्षाव