भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर (ZIMvsIND) जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनला दिली होती. मात्र त्याला वगळून राहुलला कर्णधार केल्याने मोठे वादळ निर्माण झाले आहे. तसेच अनेक प्रश्नही उभे राहिले आहेत. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे धवनला डालवून राहुलला का कर्णधार केले असेल. दोघांची आकडेवारी पाहता हे नक्कीच एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे धवनच उत्तम ठरत आहे, तरी राहुल का झाला कर्णधार हे जाणुन घेऊया.
केएल राहुल (KL Rahul) याने फिटनेस टेस्ट पास केली असून तो झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाशी जोडला गेला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आधीच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात राहुलला उपकर्णधार आणि रोहित शर्मा याला कर्णधार केले आहे. यामुळेच राहुल फिट झाल्याने त्याला झिम्बाब्वेच्या दौऱ्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) याला हटवून कर्णधार केले आहे.
कर्णधार केएल राहुल
राहुलने ज्या सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या कर्णधाराची जबाबदारी घेतली. त्या सर्व सामन्यांमध्ये संघाच्या हाती निराशा आली आहे. राहुलने ज्या ४ सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भुषविले आहे, त्या चारही सामन्यात भारत पराभूत झाला आहे. यामध्ये एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांचा समावेश आहे.
राहुलने यावर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्यांदा संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्या दौऱ्यात झालेल्या तिन्ही वनडे सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. याच दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यावेळेचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पूर्णपणे फिट नव्हता. यामुळे राहुलला पहिल्यांदा कसोटीमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. हा सामना भारताने ७ विकेट्सने गमावला होता.
कर्णधार शिखर धवन
अनुभवी फलंदाज शिखर धवन हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने ६ वनडे सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. यातील पाच सामन्यांत भारत जिंकला आहे. तसेच तो तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत कर्णधार असताना संघाने एक सामना जिंकला तर दोन सामने गमावले आहेत.
धवनने मागील वर्षीच्या जुलै महिन्यात भारतीय संघाचे पहिल्यांदा कर्णधारपद भुषविले होते. नुकतेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात वनडे मालिकेत ३-० असा विजय मिळवला आहे. त्याआधी त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्धही वनडे मालिका २-१ने जिंकली होती. तर याच दौऱ्यातील टी२० मालिका २-१ अशी गमावली होती.
राहुलची २०२२मधील आतंरराष्ट्रीय कामगिरी
राहुल यावर्षीच्या फेब्रुवारीपासून एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याची वेस्ट इंडिज विरुद्ध संघात निवड झाली होती, मात्र कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने त्याला खेळता आले नाही. त्याआधी त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवडले होते. या दौऱ्यातील तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांतील संघामध्ये त्याचा समावेश होता. मात्र तो दुखापतीमुळे त्या सातही सामन्यांना मुकला होता.
झिम्बाब्वेच्या दौऱ्यानंतर राहुल युएईला रवाना होणार आहे. एशिया कप २७ ऑगस्टपासून सुरू होत असल्याने त्याची संघात निवड झाली आहे. तसेच त्याला या स्पर्धेत संघाचा उपकर्णधार केले आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी २८ ऑगस्टला आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाटलाच्या लेकानं गाजवलीय कर्नाटकातील टी-२० लीग, शतक ठोकत आयपीेएल पदार्पण केलंय फिक्स
सॅम करनची तुफानी फटकेबाजी! विजयानंतर ‘ही’ गोष्ट बोलत जिंकली मने
भारतीय समजून अभद्र शब्द वापरायचे आपलेच संघ सहकारी, ‘या’ किवी खेळाडूने मांडली व्यथा