पाकिस्तानचा संघ 1960 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. कानपूरमधील दुसर्या सामन्यासाठी भारतीय संघ ट्रेनने दाखल झाला. कानपूर स्टेशनवर पंजाब मेलने सायंकाळी साडेसहा वाजता भारतीय संघ पोहोचला. अंधार पडता-पडता संघ हॉटेलमध्ये पोहोचला आणि चाहत्यांनी पाठविलेले ग्रीटिंग्ज कार्ड ते पाहू लागले. कर्णधाराने एक कार्ड उचलले. त्याच्यावर असे लिहिले होते की, तो त्यांचा आणि संपूर्ण भारतीय संघाचा मोठा चाहता आहे.
मात्र, त्या पत्राची शेवटची ओळ होती, ‘लक्षात ठेवा तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळत आहात. तुम्ही जिंकू शकला नाहीतरी चालेल पण सामना ड्रॉ तरी करा. जर तुम्ही हरलात तर मी तुम्हाला ठार मारीन.’ ही जीवे मारण्याची धमकी मिळालेले कर्णधार होते ‘नारी कॉन्ट्रॅक्टर’.
जन्माची अनोखी कहाणी
नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या जन्माची एक मजेदार कहाणी आहे. नारी यांचे कुटुंब मुंबईत राहत होते. त्यांची आई काही कारणांनी गुजरातच्या दाहोद या आपल्या माहेरी गेली होती. गर्भवती असतानाच त्या मुंबईकडे येण्यास निघाल्या. त्या ज्या ट्रेनने प्रवास करत होत्या ती ट्रेन त्यांचा भाऊच चालवत होता. आपल्या बहिणीची तब्येत अचानक खराब झाल्याने त्याने आपल्या बहिणीला गोध्रा येथील एका दवाखान्यात दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी येण्याचे आश्वासन दिले. नशिबाने त्याच दिवशी म्हणजे 7 मार्च 1934 रोजी त्या गर्भवती महिलेने एका मुलाला जन्म दिला, जो पुढे जाऊन नरिमन जमशेदजी कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच नारी कॉन्ट्रॅक्टर या नावाने ओळखला जाऊ लागला.
… आणि नारी यांना मुंबईचे असताना गुजरातसाठी खेळावे लागले
नारी हे 1955 मध्ये नाशिक येथे राहत. त्यावेळी मुंबई क्रिकेट संघाच्या ट्रायल्स चालू होत्या. नारी यांनी त्या ट्रायलमध्ये सहभाग घेतला. त्याचवेळी गुजरातचे कर्णधार फिरोज खंबाटा यांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांनी त्यांना गुजरातसाठी खेळण्याबाबत विचारले. नारी त्यांना मुंबईसाठी खेळायचे होते म्हणून त्यांनी गुजरातकडून खेळण्यासाठी नकार कळविला. दुर्दैवाने त्यांना मुंबई संघात निवडले गेले नाही आणि त्यांनी गुजरात क्रिकेट संघटनेला तार करत आपण खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले.
बडोद्याविरुद्धच्या सामन्यासाठी त्यावेळी गुजरात संघाची निवड झाली होती. तरीही, त्यांना ट्रायलसाठी बडोदा येथे बोलावले गेले. संयोगाने त्यांचा जन्म ज्या भूमीवर झाला होता त्याच भूमीवर त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी सर्वांची मने जिंकत संघात आपली जागा बनवली. विशेष म्हणजे, ज्या फिरोज खंबाटा यांनी त्यांना गुजरातसाठी खेळण्याबाबत विचारले होते त्यांच्याच जागी नारी यांना रणजी पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणातच दोन्ही डावात शतक झळकावून त्यांनी गुजरातला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. पदार्पणात दोन्ही डावात शतक ठोकणारे त्यावेळी ते अवघे दुसरे फलंदाज होते.
राष्ट्रीय संघात पदार्पण
लवकरच, 1955 मध्ये 21 व्या वर्षी नारी यांचे नाव भारतीय कसोटी संघात आले. मुंबईत खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात नारी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आले. पहिल्या सामन्यात त्यांनी 16 धावा केल्या. मात्र, विनू मंकड आणि सुभाष गुप्ते यांनी भारताला डावाने विजय मिळवून दिला. पुढचा सामना दिल्ली येथे होणार होता आणि त्या सामन्यात विनू मंकड खेळत नव्हते. नारी यांना या सामन्यात सलामीवीर म्हणून उतरविण्यात आले. ज्या खेळाडूला एक वर्षापूर्वी मुंबई संघाने नाकारले होते, त्याच खेळाडूने या सामन्यात अर्धशतक झळकावून सर्वांची वाहवा मिळवली होती.
पुढे, नारी सातत्याने भारतीय संघाच्या विजयात योगदान देऊ लागले. बरगड्यांचा चुरा झाला असतानाही लॉर्ड्सवर खेळली गेलेली त्यांची 81 धावांची खेळी कोणताही क्रिकेटप्रेमी विसरला नाही. पुढे ऑस्ट्रेलियाला इतिहासात पहिल्यांदा हरवताना त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले आणि एकमेव शतक झळकावले.
कर्णधारपद आणि पाकिस्तान विरुद्धची मालिका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर विनू मंकड निवृत्त झाले आणि नारी यांच्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. पहिल्याच मालिकेत त्यांच्यासमोर पाकिस्तानचा संघ उभा ठाकणार होता. या मालिकेच्या सुरूवातीचा एक मजेदार किस्सा आहे. पाकिस्तानच्या संघात मुख्य फलंदाज हनिफ मोहम्मद ताबडतोब पद्धतीने खेळायचे. मालिकेच्या अगोदर त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांना कदाचित संघात स्थान मिळणार नाही असं वाटत होतं. मात्र, नाणेफेक होताना नारी यांना पाकिस्तान संघाचा यादीत हनिफ यांचे नाव दिसले. हनीफला पुन्हा दुखापत होईपर्यंत ते हनीफला रनर घेण्यास परवानगी देणार नाही, असे नारी यांनी पाकिस्तानी कर्णधार फजल मेहमूद यांना सांगितले. हनीफ यांनी त्या सामन्यात रनरशिवाय 160 धावा केल्या. त्यांना साथ देताना सईद अहमद यांनी 121 धावा फटकावल्या. सामना अनिर्णीत राहिला. दिल्ली कसोटी देखील अनिर्णीत संपली. त्यानंतरची सामना कानपूरमध्ये होती, जिथे नारी यांना चाहत्याकडून एक पत्र आले ज्यात लिहिले होते की, पाकिस्तानकडून पराभव पत्करला तर मी तुम्हाला ठार मारीन. नारी यांच्याच नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची किमया केली होती.
आपल्या बेधडक खेळामुळे नारी हे महिला चाहत्यांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले होते. अनेक मुली त्यांना प्रेमपत्र लिहायच्या. तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी अनेक वर्षानंतर एका मुलाखतीत सांगितले होते की, नारी कॉन्ट्रॅक्टर हे त्यांचे पहिले क्रश होते आणि त्या फक्त नारी यांचा खेळ पाहण्यासाठी मैदानांत जात.
कारकिर्दीची दुर्दैवी अखेर
नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या कारकिर्दीची अखेर अत्यंत दुर्दैवी राहिली. भारताचा संघ 1962 मध्ये वेस्टइंडीज दौऱ्यावर गेला असता पहिल्या दोन कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात नारी खेळणार नव्हते. मात्र, सामन्याच्या आदल्या दिवशी वेस्ट इंडिजचे कर्णधार फ्रँक वॉरेल यांनी सांगितले की, चार्ली ग्रिफीथ नावाचा एक नवा गोलंदाज आम्ही खेळणार आहोत जो अतिशय खतरनाक बाउन्सर टाकतो. त्या परिस्थितीत अनेक भारतीय फलंदाजांनी आपण फिट नसल्याचे सांगत सामन्यातून काढता पाय घेतला.
नारी यांनी जबाबदारी घेत सलामीला उतरण्याचे ठरवले. दिलीप सरदेसाई लवकर बाद झाल्यानंतर, सामन्यातील तिसऱ्या षटकात चार्ली यांचा एक चेंडू घेऊन सरळ नारी यांच्या डोक्यावर लागला. खरेतर, चार्ली गोलंदाजी करत असताना अचानकपणे साईट स्क्रीन शेजारील खिडकीची काच चमकल्याने त्यांची नजर हटली आणि चेंडू डोक्यावर लागला. त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. इकडे मैदानात चार्ली यांनी विजय मांजरेकर यांनादेखील दुखापतग्रस्त केले. आणीबाणीच्या परिस्थितीत नारी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी व पॉली उम्रीगर यांनी त्यावेळी त्यांना रक्त दिले. सोबतच, वेस्ट इंडिजचे कर्णधार फ्रँक वॉरेल यांनी देखील त्यांना रक्त देऊन खिलाडूवृत्ती दाखवली. नारी तब्बल सहा दिवस बेशुद्ध होते.
दुखापतीनंतर पुन्हा मैदानात
डोक्याच्या त्या दुखापतीनंतर नारी पुन्हा एकदा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. मात्र, त्यांना राष्ट्रीय संघात पुनरागमन करता आले नाही. पुढे, भारतीय निवडकर्ता बनलेले गुलाम मोहम्मद यांनी नरी यांच्या पत्नीला विचारले की, “अशा दुखापतीनंतर तुम्ही त्याला खेळू कसे काय देता?”
त्यावर त्यांच्या पत्नीने उत्तर दिले होते, “ते पुन्हा खेळतात ते त्यांचे नशीब आहे. त्यांच्या नशिबाच्या आड येणारी मी कोण?”
पुढे नारी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे प्रशिक्षकपद भूषवले. एकदा दिल्ली विमानतळावर त्यांच्या डोक्यात लावलेल्या धातूमुळे त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांनी आपल्या सोबत घडलेल्या घटनेची रंजक कहाणी त्या अधिकाऱ्यांना सांगायला सुरुवात केली. नारी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2007 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत त्यांचा यथोचित सन्मान केला. दुर्दैवाने झालेल्या दुखापतीमुळे वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी भारताच्या सर्वात तरुण कर्णधाराला आपली क्रिकेट कारकीर्द संपवावी लागली. अन्यथा, कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटमधील अनेक विक्रम नारी यांनी आपल्या खात्यावर जमा करून घेतले असते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान
मॅथ्यूज-सिव्हरच्या दणक्याने आरसीबीची धूळधाण! मुंबईचा WPL मध्ये सलग दुसरा विजय